बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (MES) कार्यकर्त्यांनी वाशी येथील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या एक्स्पोर्ट फॅसिलिटीला भेट देऊन तेथील शेतमालाची साठवणूक, पॅकिंग आणि निर्यात व्यवस्थेची पाहणी केली.
सीमाभागातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळावा, यासाठी महाराष्ट्र सरकारने शिंनोळी-चंदगड येथे अत्याधुनिक पॅकिंग हाऊस आणि एक्स्पोर्ट फॅसिलिटी उभारावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सीमाभागात मोठ्या प्रमाणात शेतमालाचे उत्पादन होते. मात्र, योग्य साठवणूक, पॅकिंग आणि निर्यातीची सुविधा उपलब्ध नसल्याने अनेकदा शेतकऱ्यांना आपला माल कवडीमोल भावात विकावा लागतो. शिंनोळी-चंदगड येथे निर्यात सुविधा उभारल्यास सीमाभागातील हजारो शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होईल. तसेच शेतमालाला चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होऊन स्थानिक पातळीवर निर्यातदारही तयार होतील, असा विश्वास समितीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

या सुविधेमुळे सीमाभागातील कृषी उत्पादनांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास हातभार लागेल, असेही यावेळी सांगण्यात आले.
या पाहणी दौऱ्यात महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा कार्यकर्ते सागर पाटील, कपिल भोसले, मोतेश बरदेशकर, विराज मुरकुंबी तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे कौन्सिलर निलेश मुतकेकर उपस्थित होते.





