बेळगाव लाईव्ह: भर पावसाची तमा न बाळगता अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेळगावात आंदोलन केले. **अंगणवाडी वर्कर्स अँड हेल्पर्स फेडरेशन (AITUC संलग्न)**च्या वतीने आयोजित या आंदोलनात जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या २८ प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. मानधन वाढविणे, २०११ पासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी देणे, निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करणे तसेच अंगणवाडी सेविकांवर सक्तीने सोपविण्यात येणारी बीएलओची जबाबदारी थांबविण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
अंगणवाडीच्या नियमित कामांसोबत बीएलओ, एसआयआर, गृहलक्ष्मी तसेच विविध सर्वेक्षणांची अतिरिक्त कामे दिली जात असल्याने अंगणवाडी केंद्रातील मूलभूत कामकाजावर परिणाम होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामांमधून मुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली.
अंगणवाडी सेविकांना १५ हजार रुपये आणि मदतनीसांना १० हजार रुपये मानधन देण्याची मागणीही करण्यात आली. तसेच किमान वेतन लागू करणे, वैद्यकीय सुविधा, मासिक पाळीची रजा, ६५ वर्षांपर्यंत निवृत्तीचे वय, निवृत्तीनंतर पेन्शन आणि अंगणवाडी केंद्रांमध्येच एलकेजी-यूकेजी सुरू करण्यासह विविध मागण्या निवेदनातून मांडण्यात आल्या.

दरम्यान, भर पावसातही आंदोलनकर्त्यांनी ठामपणे आपल्या मागण्या मांडत सरकारचे लक्ष वेधले. सरकारने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा AITUC संलग्न अंगणवाडी वर्कर्स अँड हेल्पर्स फेडरेशनचे नेते अॅड. नागेश सातेरी यांनी दिला.





