बेळगाव लाईव्ह : शाळा सोडून अनेक वर्षे झाली… आयुष्याच्या वाटेवर प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात पुढे गेला. कुणी शिक्षक झाले, कुणी सेनादलात गेले, कुणी पोलीस दलात सेवा बजावली, तर कुणी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली. मात्र, ज्या शाळेने त्यांच्या आयुष्याची पहिली पायरी भक्कम केली, त्या शाळेचे ऋण ते विसरले नाहीत.
तब्बल ४३ वर्षांनंतर गर्लगुंजीतील १९८१-८२ च्या मराठी प्राथमिक शाळेच्या सातवीच्या आणि १९८३-८४ च्या ज्योतिराव फुले विद्यालयाच्या बॅचमधील माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र आले आणि आपल्या शाळेप्रती कृतज्ञता कृतीतून व्यक्त केली.
जानेवारी महिन्यात या माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळावा आयोजित केला होता. या वेळी आपल्या शाळेतील गुरुजन आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांना निमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याच कार्यक्रमात “आपल्याला घडविणाऱ्या शाळेसाठी आपण काहीतरी करायचे”, असा संकल्प माजी विद्यार्थ्यांनी केला.
या संकल्पाची पूर्तता करत १७ ऑगस्ट रोजी माजी विद्यार्थ्यांनी मराठी प्राथमिक शाळेला विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेले बेंच भेट दिले. तसेच ज्योतिराव फुले विद्यालयाच्या सुरक्षिततेसाठी शाळेच्या कंपाऊंडला आवश्यक असलेले मुख्य गेट तयार करून बसवून दिले.
आठवणींच्या शाळेला कृतीतून सलाम
ही केवळ भेट नव्हती, तर आपल्या बालपणाला आणि आपल्याला घडविणाऱ्या गुरुजनांना दिलेला एक भावनिक सलाम होता. ज्या वर्गांमध्ये बसून या विद्यार्थ्यांनी अक्षरओळख केली, स्वप्ने पाहिली आणि जीवनाची दिशा ठरवली, त्याच शाळेतील आजच्या विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, हा या उपक्रमामागचा उद्देश आहे.
विशेष म्हणजे, या बॅचमधील अनेक विद्यार्थी आर्थिक आणि कौटुंबिक अडचणींवर मात करत शिकले. मात्र, परिस्थितीवर मात करून त्यांनी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले. काहीजण प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, काहीजण सेनादल व पोलीस दलात, तर काहीजण राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही आपल्या शाळेची आठवण मनात जपून ठेवत, पुन्हा त्याच शाळेसाठी काहीतरी देण्याची भावना त्यांनी जपली. त्यामुळेच या उपक्रमाला केवळ देणगीचे नव्हे, तर कृतज्ञतेचे आणि सामाजिक बांधिलकीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
आता प्रयोगशाळेसाठीही पुढाकार घेण्याचे आवाहन
माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक आणि एस.डी.एम.सी. कमिटीने कौतुक केले. मराठी प्राथमिक शाळेचे एस.डी.एम.सी. अध्यक्ष संतोष पाटील यांनी माजी विद्यार्थ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
तसेच शाळेत विद्यार्थ्यांसाठी उत्तम विज्ञान प्रयोगशाळा उभारण्यासाठीही माजी विद्यार्थ्यांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. अशा सुविधांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी मोठी मदत होईल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
या उपक्रमासाठी सुरेश भातकांडे, पुंडलिक मेलगे, मल्लाप्पा वारनुरकर, बी.के. कोलेकर, कल्लाप्पा भेंडीगिरी, शिवाजी पाटील, संतोष पाटील, मोहन गोरे, विलास जाधव, शिवाजी भक्तुरी, सुबराव पाटील, पी.डी. कुंभार, प्रकाश गुंजीकर, सुहास पाटील, प्रताप पाटील, रमाकांत पाटील, परशुराम पाटील, राजेंद्र हंपन्नावर, दत्तू भातकांडे, पी.आर. कुंभार, एल.डी. पाटील यांच्यासह बॅचमधील सर्व माजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
४३ वर्षांपूर्वी ज्या शाळेच्या दारातून ते भविष्याच्या दिशेने बाहेर पडले होते, त्याच शाळेच्या दाराला आज त्यांनी एक नवे गेट दिले… आणि आपल्या आठवणींना पुन्हा एकदा वर्तमानाशी जोडले. माजी विद्यार्थ्यांचा हा उपक्रम गावातील इतर बॅचच्या विद्यार्थ्यांसाठीही निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.





