बेळगाव लाईव्ह : मराठी मुलांची व मुलींची शाळा क्रमांक ३३ परिसरात गेल्या सात-आठ वर्षांपासून वापराविना आणि जीर्ण अवस्थेत असलेली पाण्याची टाकी अखेर हटविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. धोकादायक अवस्थेतील या टाकीमुळे शाळकरी विद्यार्थी, स्थानिक नागरिक आणि ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता.
ही टाकी गेल्या अनेक वर्षांपासून वापरात नव्हती. कालांतराने तिची अवस्था अत्यंत जीर्ण झाली होती. त्यामुळे टाकीचा काही भाग कोसळण्याची शक्यता असल्याने ती तातडीने हटविण्याची मागणी करण्यात येत होती.
टाकी हटविण्यासाठी शाळा विकास व व्यवस्थापन समिती (SDMC), स्थानिक नागरिक, युवक कार्यकर्ते आणि शाळेचे माजी विद्यार्थी यांनी संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा केला. यापूर्वी निवेदने देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, बराच काळ कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती.

दरम्यान, मागणीला अलीकडे जोर मिळाला. प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यासोबतच आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर अखेर प्रशासनाने या प्रश्नाची दखल घेतली.
टाकी पाडण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदाराची निवड करण्यात आली असून, आता प्रत्यक्ष पाडकामाला सुरुवात झाली आहे.वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने परिसरातील नागरिक आणि शाळा विकास समितीने समाधान व्यक्त केले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरलेली ही टाकी हटविण्याची मागणी पूर्ण झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
या कामासाठी सहकार्य करणारे नागरिक, प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि माध्यमांचे नागरिकांकडून आभार मानण्यात आले.सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि नागरिकांच्या एकजुटीमुळे अखेर सात-आठ वर्षांपासून धोकादायक ठरलेली पाण्याची टाकी हटविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.





