बेळगाव लाईव्ह : शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्यांच्या विविध मागण्यांसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (CITU) बेळगाव जिल्हा समितीच्या वतीने सोमवारी (10 ऑगस्ट) जेलभरो आंदोलन करण्यात आले. मुसळधार पाऊस सुरू असतानाही मोठ्या संख्येने कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून आंदोलनाला सुरुवात झाली. त्यानंतर चन्नम्मा सर्कलमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शने केली.
शेतकरी आणि कामगारविरोधी धोरणे थांबवावीत, कामगारांना सुधारित किमान वेतनाची तातडीने अंमलबजावणी करावी, सक्तीचे व अन्यायकारक भूसंपादन थांबवावे, कॉर्पोरेट कंपन्यांकडून होणारी जमीन बळकावण्याची प्रक्रिया रोखावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
तसेच नवीन कामगार संहिता लागू करू नये, ‘व्हीबी ग्राम जी’ कायदा रद्द करावा, विद्युत सुधारणा कायदा 2025 मागे घ्यावा, महागाई नियंत्रणात आणावी आणि आयसीडीएस, अक्षर दासोह यांसह विविध सरकारी योजनांचे खासगीकरण थांबवावे, अशा मागण्या CITUने केल्या.
22 मे 2026 रोजी किमान वेतनाबाबत अधिसूचना जारी होऊनही दोन महिने उलटले आहेत. मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे राज्य सरकारने मालकांच्या दबावाला बळी न पडता सुधारित वेतन तातडीने लागू करावे, अशी मागणीही आंदोलकांनी केली.
दरम्यान, मुसळधार पाऊस सुरू असतानाही आंदोलकांनी आंदोलन मागे न घेता भरपावसात निदर्शने केली. शेतकरी, कामगार, महिला, दलित, विद्यार्थी आणि युवकांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.






