बेळगाव लाईव्ह : गेल्या 70 वर्षांपासून महाराष्ट्र एकीकरण समिती लोकशाही मार्गाने सीमालढा प्राणपणाने लढत असताना त्याला गालबोट लावण्याचे लांछनास्पद काम काही कन्नड संघटनांकडून सातत्याने केले जात असल्याचा आरोप येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीने केला आहे. अशा कृतींमुळे सीमाभागातील वातावरण कलुषित होत असून प्रशासनाकडूनही या उपद्रवी संघटनांना खतपाणी घातले जात असल्याची टीका समितीने केली.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने शांततेच्या मार्गाने निवेदन दिल्यानंतरही मराठी समाजाला डिवचण्याचे प्रकार घडत असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. संबंधित संघटनांवर वेळीच आवर घालावा, अन्यथा मराठी माणूस योग्य तो बंदोबस्त करेल, असा सज्जड इशारा यावेळी देण्यात आला.
येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत हा ठराव करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष वामन पाटील होते.

यावेळी प्रकाश अष्टेकर, दत्ता उघाडे, दुद्दापा बागेवाडी आणि नागेश बोबाटे यांनी आपले विचार व्यक्त केले.
बैठकीस प्रकाश पाटील, सुरज गोरल, दयानंद उघाडे, सतीश शिवाजी पाटील, नेताजी गोरल, कृष्णा शहापूरकर, यलुप्पा पाटील, बाळकृष्ण पाटील, कृष्णा बिजगरकर, राकेश परीट, भोला पाखरे, प्रदीप देसाई, सतीश कुगजी, रमेश धामणेकर, नंदकुमार पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.




