बेळगाव लाईव्ह : निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार यादी मॅपिंग प्रक्रियेत मोठा गोंधळ निर्माण झाला असून ही प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याबद्दल पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत सर्व मॅपिंग पूर्ण करण्याचा अल्टिमेटम अधिकाऱ्यांना दिला. सध्या जिल्ह्यात केवळ ७१ टक्के काम झाले असून नवीन नाव नोंदणीसाठी जन्म दाखला अनिवार्य करण्यात आला आहे. कोणत्याही मतदाराचे नाव यादीतून वगळले जाणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
डीसीसी बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या विधानाचा समाचार घेताना सतीश जारकीहोळी यांनी बँकेला खडे बोल सुनावले. डीसीसी बँक ही मुळात शेतकऱ्यांची बँक असून नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना कर्ज देणे ही बँकेची जबाबदारीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्ज मर्यादा वाढवण्याचा निर्णय नाबार्ड आणि आरबीआयच्या अखत्यारीत असला, तरी बँकेने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
जिल्ह्याच्या विकास कामांबाबत बोलताना सतीश जारकीहोळी यांनी आगामी अर्थसंकल्पात बेळगावसाठी मोठी तरतूद करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. हिडकल जलाशयात वृंदावन गार्डनच्या धर्तीवर उद्यान विकसित करणे आणि गोकाक पर्यटन क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी विशेष पॅकेज मिळवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

राजकीय प्रश्नावर भाष्य करताना त्यांनी डी.के. शिवकुमार यांच्याबद्दलच्या विधानावर बोलणे टाळले, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच होतील, असे स्पष्ट केले.




