बेळगाव लाईव्ह :सासरच्या मंडळींचा छळ असह्य होऊन आजारी पडलेल्या एका महिलेचा उपचाराचा फायदा न होता बीम्स हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला असून आपल्या मुलीच्या मृत्यू तिची सासरची मंडळीच कारणीभूत असल्याचा आरोप करत मयत विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी हॉस्पिटलसमोर एकच आक्रोश केल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी घडली.
संशयास्पद मृत्यू झालेल्या महिलेचे नाव नस्तहिन देसाई (वय 25) असे आहे. महिन्याभरापासून खूपच आजारी असल्यामुळे तिला नुकतेच बिम्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तथापि उपचाराचा फायदा न होता तिचे निधन झाले.
यासंदर्भात पतीसह सासरच्या मंडळींनी छळ करून नस्तहिनचा खून केला असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. नस्तहिन हिचा चार वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील चंदगड येथील रेहान नेसरीकर (वय 27) त्याच्याशी विवाह करून देण्यात आला होता. या दाम्पत्याला एक लहान मुलगी देखील आहे. विवाह झालेल्या दिवसापासून नस्तहिन हिला मानसिक त्रास दिला जात होता.
गेल्या चार वर्षापासून तिचा निरंतर छळ केला जात असल्याची तक्रार तिच्या शोकाकुल कुटुंबीयांनी केली आहे. बऱ्याचदा अन्नपाणी न देता तिला उपाशी ठेवले जात होते. या पद्धतीने मानसिक व शारीरिक त्रासाबरोबरच उपाशी ठेवण्यात येत असल्यामुळे तब्येत खालावून नस्तहिन वारंवार आजारी पडत होती.

मात्र सासरच्या लोकांकडून तिला दवाखान्यात दाखवून उपचार करण्याकडे दुर्लक्ष केले जात होते. थोडक्यात सर्व प्रकारचा मानसिक आणि शारीरिक झळ आमच्या मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे. आमच्या मुलीवर झालेला अन्याय इतर कोणाच्या मुलीवर होता कामा नये. नस्तहिनच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही मयत नस्तहिनच्या कुटुंबीयांनी केली आहे.
नस्तहिनच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर बेळगाव बीम्स हॉस्पिटलसमोर दोन्ही कुटुंबांमध्ये आज सकाळी जोरदार भांडणही झाले. सिव्हिल हॉस्पिटलच्या ओपीडी विभागामध्ये दोन्ही कुटुंबांमध्ये शाब्दिक खडाजंगी उडून कांही काळ वातावरण तापले होते. त्याचप्रमाणे मयत नस्तहिनचे काही नातलग रडून आक्रोश करताना दिसत होते. सदर घटना एपीएमसी पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत घडली आहे




