Monday, May 12, 2025

/

बलवान भारतीय सैन्य पाक दहशतवाद्यांचा खातमा करण्यास सज्ज : माजी सैनिकाचा अनुभव

 belgaum

बेळगाव लाईव्ह : पूर्वीपेक्षा आता भारतीय सैन्यशक्ती खूपच बलवान झाली आहे. त्यामुळे यावेळी पाकिस्तानी दहशतवादी आणि त्यांचे तळ पूर्णपणे नष्ट केले पाहिजेत, असे मत माजी सैनिक सुभेदार प्रकाश पाटील यांनी व्यक्त केले आहे.

याबाबत निपाणी तालुक्यातील भोजवाडी गावचे रहिवासी असलेले माजी सुभेदार प्रकाश पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपले अनुभव कथन केले. प्रकाश पाटील हे बेळगाव येथील मराठा लाईट इन्फन्ट्री, बेळगाव मार्फत १९८८ मध्ये भारतीय सैन्यात भरती झाले होते. त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये १२ वर्षे तसेच पठाणकोट, गुजरात आणि सिक्कीममध्ये सेवा बजावली आहे. एकूण ३० वर्षे सैन्यदलात सेवा दिल्यानंतर २०१८ मध्ये ते निवृत्त झाले.

पाकिस्तानातील दहशतवाद्यांशी झालेल्या थरारक चकमकींबद्दल बोलताना ते म्हणाले की, २००६ मध्ये जम्मू काश्मीरच्या कुपवाडा येथे दहशतवाद्यांनी माझ्यावर ३० गोळ्या झाडल्या होत्या. यामुळे माझ्या पोटातील आतडे बाहेर आले होते आणि एक हात तुटला होता. उपचारांनंतर मी पूर्णपणे बरा झालो आणि पुन्हा सेवेत रुजू झालो.

ते पुढे म्हणाले की, त्यावेळी भारतीय सैन्याला इतके स्वातंत्र्य नव्हते आणि पुरेशी सैन्य सामग्रीही उपलब्ध नव्हती. मात्र आता केंद्र सरकारने भारतीय सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. तसेच सैन्य सामग्री देखील उत्कृष्ट दर्जाची आहे. त्यामुळे आता पाकिस्तानी दहशतवादी आणि त्यांच्या मूळ तळांना पूर्णपणे उद्ध्वस्त करावे, असा तीव्र आक्रोश त्यांनी आपल्या शब्दांतून व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.