Thursday, April 18, 2024

/

शिवसेनेची पुनरावृत्ती समितीबाबत नको : समिती नेत्यांनी वेळीच सावध राहणे गरजेचे

 belgaum

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आणि पडद्यामागील गोष्ट आता हळूहळू उलगडू लागली आहे. सध्या महाराष्ट्रात जे राजकारण सुरु आहे ते जगजाहीर आहे. महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपने साठमारी करून खिंडार पाडली. शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला आपल्याकडे वळविण्यात भाजपाला यश आले.

शिंदे गटाने शिवसेनेशी केलेली गद्दारी सर्वश्रुत असतानाच जे शिवसेनेचं आहे ते सर्वकाही माझं आहे असा अविर्भाव आणि वल्गना होत असताना भाजपकडूनही या प्रकाराला खतपाणी दिलं जात आहे. महाराष्ट्रात सुरु असलेला हा राजकीय संघर्ष सर्वसामान्यांच्या पचनी पडत नाही. अत्यंत हीन पातळीवर सुरु असलेले हे राजकारण पाहून शिवसैनिक अस्वस्थ होताना दिसत आहेत. विविध पातळीवर निवडणूक आयोगासमोर न्यायालयात वेगवेगळ्या पद्धतीने केसीस दाखल होणे, यादरम्यान सुरु असलेला, सर्वांच्या नजरेस येणारा केंद्राचा हस्तक्षेप आणि याचदरम्यान शिंदे गटाकडे देण्यात आलेले सर्व हक्क यामुळे जनता अक्षरशः हताश झाली आहे. न्यायालयीन प्रक्रिया असो किंवा निवडणूक आयोगासमोरील न्यायनिवाडा या दोन्ही बाबतीत प्रक्रिया प्रामाणिक झालेली आहे कि नाही याची शाश्वती कोणालाच देता येत नाही.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात रचण्यात आलेल्या डावात भाजपचा वाटा आणि भाजपचा हस्तक्षेप लक्षणीय होता हि बाब आता लपून राहिलेली नाही. ईडीची भीती, विविध प्रकारणांतर्गत केस दाखल होण्याची भीती यामुळे शिवसेनेत दुफळी माजली. शिवसेनेची वाताहत झाली. यामागे भाजपासारख्या पक्षाचा हात असणे हि बाब अशोभनीय आहे. महाराष्ट्रातील ताकदवान संघटना नेस्तनाबूत करण्यासाठी रचलेला डाव आणि यासाठी सुरु असलेली कुटील राजनीती यामुळे जनता मात्र अस्वस्थ झाली आहे.

 belgaum

बाळासाहेब ठाकरे हयातीत असताना शिवसेनेला नेस्तनाबूत करणे शक्यच नव्हते. मात्र, महाराष्ट्रातील मजबूत संघटना नेस्तनाबूत केल्याशिवाय आपला पाय रोवता येणार नाही हि बाब लक्षात घेऊन बाळासाहेबांच्या निधनानंतर भाजपाला रान मोकळे झाले. ईडी आणि इतर गोष्टींची भीती दाखवून अनेक नेत्यांना भाजपने आपल्या गळाला लावले, भ्रष्टाचाराने माखलेले अनेक नेते भाजपच्या गौताळा गेले. सुरतमार्गे गुवाहाटी आणि गोवा मार्गे महाराष्ट्र असा प्रवास करत शिवसेनेची लक्तरे पाडली गेली. हा खेळ भाजपने अनेक राज्यात खेळला असून आता भाजपचा मोर्चा सीमावर्ती भागाकडे वळला आहे. बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समिती हि भाजपच्या विजयात मोठा अडथळा ठरत आली असून आता समितीमधील नेते, कार्यकर्ते आणि प्रमुख्याने तरुण मंडळींना विविध प्रलोभने देत समितीमध्येही फूट पडण्याचा कुटील डाव भाजप आखत असल्याचे निदर्शनात येत आहे. रोजगार मेळावा, मोठमोठ्या जाहिराती आणि यामागे सुरु असलेले षडयंत्र हि सारी पाऊले महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी वेळीच ओळखणे गरजेचे आहे.

विविध आमिषांना बळी पडून आधीच भाजपच्या गळाला लागलेल्या कार्यकर्त्यांनी हि बाब वेळीच ओळखली नाही तर जी गत शिवसेनेची महाराष्ट्रात झाली तीच गत महाराष्ट्र एकीकरण समितीची होईल. सीमाभागात आपले पाय रोवताना हिंदुत्वाच्या नावाखाली महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिपत्याखाली असलेली मोठी तरुणाई आपल्याकडे वळविण्यात भाजपाला यश आले आहे. काही हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून अनेक तरुणांना भाजपाकडे वळविण्यात आले आहे. सध्या रोजगाराचे आमिष दाखवून महाराष्ट्र एकीकरण समितीचा काटा काढण्याचे षडयंत्र १०० टक्के सीमाभागात सुरु झाले आहे. हि चाल वेळीच ओळखणे काळाची गरज असून समिती नेत्यांनी याबाबत जागरूक राहणे अत्यावश्यक आहे. अन्यथा महाराष्ट्र एकीकरण समिती हि दुसरी शिवसेना ठरेल आणि समिती नेस्तनाबूत होईल.Mes politics vidhansabha

सीमाभागात ज्या दोन नेत्यांच्या माध्यमातून हे लोण पसरविले जात आहे त्या नेत्यांची पार्श्वभूमीही तरुणाईने तपासणे आणि शहानिशा करणे आवश्यक आहे. धैर्यशील माने आणि राजेश क्षीरसागर अशा नेतृत्वांना पुढे करून सीमाभागात ज्यापद्धतीने खेळी खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे अशा दोन्ही नेत्यांचा इतिहास देखील पडताळून पाहणे आवश्यक आहे. ज्यांनी अनेक राजकीय पक्षांना दगा देऊन वैयक्तिक स्वार्थ साधला आणि हातकनगले मतदार संघात जनादर हरवला, आणि आपण पक्षासाठी कोणतेतरी कार्य करत आहोत हे दाखवून देण्यासाठी सीमाभागात काड्या घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या धैर्यशील माने आणि कोल्हापूरकरांच्या विश्वासघात केलेल्या राजेश क्षीरसागर यांच्यासारख्या नेत्यांच्या आडून राजकीय पक्षाने जी चाल चालण्याचा प्रयत्न सुरु केला आहे अशा दोन्ही विश्वासघातकी आणि दगाबाज नेत्यांच्या माध्यमातून जाणवणारी धोक्याची घंटा सीमाभागातील जनतेने वेळीच ओळखणे गरजेचे आहे. ज्यांना स्वतःलाच रोजगार नाही आणि ज्यांचे शिक्षण कमी आहे अशा लोकांकडून रोजगार आणि शिक्षणाचे धडे घेणे याहून मोठे दुर्दैव नसेल. या खेळीमागील कावा समजून घेऊन राजकारणातून पैसा आणि पैशातून राजकारण अशा पद्धतीच्या नीतीला बळी न पडता स्वाभिमान आणि कर्तव्यदक्षपणा जागरूक ठेवणेही तितकेच महत्वाचे आहे.

अशा राजकीय डावपेचांना सीमाभागातील मराठी माणूस बळी पडला तर याहून दुसरे नतद्रष्टे कार्य नसेल. ही सर्व काळाची पाऊले ओळखून महाराष्ट्र एकीकरण समितीने सीमावर्ती भागाच्या गळ्याभोवती आवडला जाणारा हा नवा फास स्वतः ताकदीने उधळून लावला पाहिजे आणि रोजगार मेळावा तसेच एकंदर फुटीर नेत्यांच्या पाठीमागून येणारी काळरात्र जागीच थोपविणे काळाची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.