Monday, April 29, 2024

/

कोविड नियंत्रणासाठी स्थानिक संस्थांची भूमिका महत्वाची : जिल्हाधिकारी

 belgaum

सरकारने कोविड संदर्भातील मार्गसूची जाहीर केली आहे. परंतु सरकार प्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिकाही तितकीच महत्वाची असल्याचे मत, जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी व्यक्त केले. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी उपस्थित प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले, कोविड परिस्थिती हाताळण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका महत्वाची असून, त्यांनी जबाबदारीने हि भूमिका कर्तव्य म्हणून पार पाडावी. कोविड मार्गसूचीचे पालन करणे जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांची भूमिका देखील तितकीच महत्वाची आहे.

कोविड नियंत्रणात आणण्यासाठी गर्दी टाळणे महत्वाचे आहे. जनतेने कोणत्याही ठिकाणी गर्दी करू नये. सरकारने जाहीर केलेली कोविड मार्गसूची काटेकोरपणे पाळावी. नियमावलीचे सक्तीने पालन करावे. बाजारपेठेत मिळणाऱ्या वस्तू घरासमोरच मिळाल्या तर बाजारपेठेत होणारी गर्दी टाळता येते. यासाठी स्थानिक संस्थांनी पुढाकार घेऊन जनतेला सोयी सवलती पुरवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी केले.

 belgaum

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पाच विविध उपाय योजना सुचविल्या. यामध्ये चाचण्यांची संख्या वाढविणे, सरकारी नियमावलीचे पालन करणे, लसीकरणाचा वेग वाढविणे, लोकांची गर्दी टाळणे आणि यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी जनतेच्या सोयीच्या आणि हिताच्या दृष्टीने पावले उचलणे यांचा समावेश होता. याचप्रमाणे परगावाहून शहरात येणाऱ्यांनी सक्तीने कोविड टेस्ट करावी, अशी सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

सरकार, स्थानिक संस्था याप्रमाणेच जनतेनेही आपली जबाबदारी ओळखून सहकार्य करावे, कोविड मार्गसूचीचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करत कोविड नियंत्रणासाठी प्रशासन या नियमांव्यतिरिक्त इतरही उपाययोजना राबविण्याच्या मार्गावर असून लवकरात लवकर कोविड हद्दपार करू, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी – तहसीलदार बैठक पार

देशासह आता राज्यातही पुन्हा कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा फैलाव होण्याचे प्रमुख कारण गर्दी हे असून हि गर्दी टाळण्यासाठी जत्रा,यात्रा, लग्न व अन्य समारंभ आदींवर कडक निर्बंध लावण्यात यावेत, अशा समारंभाच्या ठिकाणी गर्दी आढळून आल्यास कोविड मार्गसूचीचे उल्लंघन केल्याच्या कारणास्तव थेट तहसीलदारांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी दिला.

सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून प्रांताधिकारी आणि तहसीलदारांची बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते. बेळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव वाढतच चालला आहे. यासाठी सरकारने सर्वत्र कोविड मार्गसूचीचे काटेकोर पालन करण्याचा आदेश दिला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारने जारी केलेल्या मार्गसूचीचे उल्लंघन करून जत्रा, यात्रा, लग्न व अन्य समारंभ यापैकी कोणत्याही समारंभास गर्दी आढळून आल्यास तुम्हीच जबाबदार रहाल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी तहसीलदारांना दिला. या बैठकीत जिल्ह्यातील प्रांताधिकारी आणि १४ तहसीलदारांनी या बैठकीत भाग घेतला होता.

या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी योगेश्वर, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. एस. बी. मुनशाळ, जिल्हा सर्वेक्षणाधिकारी डॉ. बी. एन. तुक्कार, पालिका आयुक्त जगदीश के. एच, पालिका आरोग्याधिकारी डॉ. संजय डूमगोळ यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.