बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील धामणे येथील शेतकऱ्यांनी शेतात जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावरील अडथळे दूर करण्यासाठी आता थेट मुख्यमंत्री आणि कृषि मंत्र्यांना पत्र लिहून न्यायाची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना वारंवार निवेदने देऊनही न्याय न मिळाल्याने शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलले आहे.
धामणे गावातील सर्व्हे नंबर ७८१ मधील जमिनीतून जाणाऱ्या रस्त्याबाबत हा वाद आहे. कल्लाप्पा बाळेकुंद्री आणि अप्पय्या बाळेकुंद्री यांच्याकडून संदीप पाटील, परशुराम पाटील आणि लक्ष्मी पाटील यांनी बेकायदेशीरपणे ही जागा मिळवल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे.
या सर्वांनी संगनमताने सार्वजनिक रस्त्यावर जेसीबीने खड्डे खणून आणि बांधकामाचे साहित्य टाकून मार्ग पूर्णपणे बंद केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे, गुरे नेणे आणि पिकवलेला ऊस कारखान्याला पाठवणे अशक्य झाले आहे.
यापूर्वी ३० जून २०२५ रोजी ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांना या रस्त्याबाबत निवेदन देण्यात आले होते. मात्र, प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने संबंधित व्यक्तींनी रस्त्यावर शेड मारून रस्ता कायमचा बंद करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना दमदाटी केली जात असल्याने, आम्हाला पोलीस संरक्षण मिळावे आणि या बेकायदेशीर कृत्यावर लगाम लावावा, असे शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
सार्वजनिक वापराच्या या जागेवर घर बांधणे किंवा ती अडवणे कायद्याने चुकीचे आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून रस्ता मोकळा करून द्यावा, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे.




