सध्याच्या कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात केंद्र व राज्य शासनाची ‘ई -संजीवनी’ ही महत्त्वाकांक्षी योजना रुग्णांसाठी संजीवनी देणारी ठरत असून राज्यात सुमारे 9.5 लाख नागरिक तर बेळगाव जिल्ह्यात सुमारे 2 लाख नागरिक या टेलीमेडिसीन सुविधेचा लाभ घेत आहेत.
कोरोना प्रादुर्भावाचा काळात आरोग्य समस्यांनी ग्रासलेल्या नागरिकांचा त्रास कांही प्रमाणात कमी व्हावा या दृष्टीने ई -संजीवनी योजना रुग्णांसाठी संजीवनी देणारे ठरत आहे. याद्वारे इच्छुक नागरिकांना टेलीमेडिसीन सुविधा पुरवण्यात येत आहे. आपल्या मोबाईलवरुन व्हिडिओ कॉलद्वारे ओपीडी सेवा पुरवण्याचा प्रयत्न सुरू असून केंद्र व राज्य सरकारची ही महत्वकांक्षी योजना आहे. राज्यात सुमारे 9.5 लाख जण तर बेळगाव जिल्ह्यात सुमारे 2 लाख नागरिकांना टेलीमेडिसीन सुविधेचा लाभ मिळत आहे.
सदर योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली असली तरी सध्याच्या कोरोना आणि लाॅक डाऊनच्या काळात या योजनेला वाढता प्रतिसाद मिळत आहे. ई -संजीवनीसाठी नागरिकांनी मोबाईलमधून गुगलद्वारे ‘ई -संजीवनी ओपीडी’ असे डाऊनलोड करून रजिस्ट्रेशन करून घ्यावे.
त्यानंतर संपर्क साधून उपलब्ध असणाऱ्या डॉक्टरांना व्हिडिओ कॉलद्वारे आजाराबाबत माहिती देता येणार आहे. यामध्ये सामान्य खोकला, ताप, सर्दी यासह अन्य आजाराविषयी कळवून औषधोपचार करून घेता येणार आहेत. यामुळे सामान्य आजार असल्यास रुग्णालयात जाण्याचे शक्य तो टाळता येणार आहे.
नागरिकांनी या टेलीमेडिसीन सुविधेचा लाभ घेतल्यास रुग्णालय व दवाखान्यातूनवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने ही योजना सुरू असून यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. दररोज सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत ही सुविधा उपलब्ध ठेवण्यात आली आहे.
यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला व मार्गदर्शन मिळणार आहे. दरम्यान 2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेचा लाभ घेण्यात तामिळनाडू राज्याने आघाडी घेतली आहे. या राज्यातील 10 लाख रुग्णांनी टेलीमेडिसीनद्वारे उपचार घेतले आहेत. तर कर्नाटक राज्याचा यामध्ये दुसरा क्रमांक असून 9.5 लाख जणांनी टेलीमेडिसीनचा आत्तापर्यंत लाभ घेतला आहे.