संस्कृती जतन करण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. मातृभाषेमुळे विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती मिळते. इंग्रजी भाषा ही हत्तीसारखी आहे. यानुसार भाषेचा लगाम आपल्यावर लादण्यात आलेला आहे. मातृभाषेतून आपल्याला आपले सत्व मिळते. भाषा संस्कृतीचे संचित प्राप्त होते. यासाठी आपल्या भाषेचा लगाम आपल्या हाती असणे गरजेचे असल्याचे मत प्रा. डी. टी. पाटील यांनी व्यक्त केले. कुद्रेमानी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
संपूर्ण सीमाभागात मराठी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन हे बहुतांशी ग्रामीण भागातच होते. मराठी संस्कृतीचा वारसा जपत आज कुद्रेमानी येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत १५ वे मराठी साहित्य संमेलन पार पडले. बलभीम साहित्य संघ आणि कुद्रेमानी ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. डी. टी. पाटील हे उपस्थित होते. गावच्या वेशीतील विठ्ठल – रुक्मिणी मंदिरापासून निघालेल्या ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात झाली. भजनी मंडळाने टाळ मृदूंगाचा ठेका धरत दिमाखात ग्रंथदिंडी संमेलनस्थळापर्यंत पोहोचविली.
संमेलनाचे उदघाटन जिल्हा पंचायत सद्स्या सरस्वती पाटील यांच्याहस्ते पार पडले. विठ्ठल रखुमाई मूर्तिपूजन गावडु गुरव, पालखी पूजन मल्लप्पा पाटील, ग्रंथपूजन लक्ष्मण पाटील, ग्रंथदिंडी उदघाटन जोतिबा बडसकर यांच्याहस्ते पार पडले. अश्वारूढ शिवपुतळ्याचे पूजन यल्लाप्पा गुरव, परशराम गुरव स्मारकाचे पूजन विष्णू जांबोटकर, सुरज शिंदे, साहित्यनगरीचे उदघाटन सदानंद धामणेकर, ग्रंथ दालनाचे उदघाटन गावडु पाटील, पॉलिहायड्रोन व्यासपीठाचे उदघाटन वंदना गुरव, ज्ञानेश्वर प्रतिमा पूजन शांताराम पाटील, तुकाराम महाराज प्रतिमा पूजन शिवाजी मुरकुटे, शिवप्रतिमापूजन आरती लोहार, महात्मा जोतीराव फुले प्रतिमापूजन रेणुका नाईक, सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन ईश्वर गुरव, राजर्षी शाहू महाराज प्रतिमा पूजन सुरेश पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमापूजन मल्लप्पा कदम यांच्याहस्ते करण्यात आले.
संमलेनाचे प्रास्ताविक पी. एल. गुरव यांनी केले. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राजाराम राजगोळकर हे होते. संमेलनाच्या पहिल्या सत्रात प्रा. डॉ. डी. टी. पाटील यांचे अध्यक्षीय भाषण पार पडले. तर दुसऱ्या सत्रात यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, हलकर्णीचे प्राध्यापक डॉ. चंद्रकांत पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन पार पडले. कोरोना पार्श्वभूमीवर हे संमेलन छोट्या स्वरूपात आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात विविध क्षेत्रातील मान्यवर, रसिक प्रेक्षक उपस्थित होते.