राज्य निवडणूक आयोगाने नुकतीच ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा केली आहे. यापाठोपाठ लोकसभा, महानगरपालिका तसेच तालुका आणि जिल्हा पंचायतीच्याही निवडणुका होणार आहेत. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर लागोपाठ इतर निवडणुकीचे आदेश जारी होण्याची शक्यता असून आगामी सहा महिने हे निवडणुकीच्याच वातावरणाचे असणार आहेत.
राज्यभरातील एकूण ५७६२ ग्रामपंचायतींसाठी होणाऱ्या निवडणुकीत ३५८८४ क्षेत्रांमधील ९२१२१ जागांसाठी ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात ११३ तालुक्यातील २९३० आणि दुसऱ्या टप्प्यात ११३ तालुक्यातील २८३२ ग्रामपंचायतींची निवडणुक होणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील एकूण ४८१ ग्रामपंचायतींसाठी दोन टप्प्यात निवडणूक होणार असून पहिल्या टप्प्यात ७ आणि दुसऱ्या टप्प्यात ७ अशाप्रकारे मतप्रक्रियेचे विभाजन करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीनंतर जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात महानगरपालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. २०१३ साली बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक झाली होती. त्यानंतर लोकनियुक्त सभागृह तब्बल एक वर्षानंतर म्हणजेच २०१४ साली अस्तित्वात आले आहे. त्यानंतर अजूनही महानगरपालिकेची निवडणूक झालेली नाही. हि निवडणूक मार्च महिन्यापूर्वी घेण्यात यावी, अशी मागणी इच्छुकांच्यावतीने करण्यात येत आहे
महानगरपालिका निवडणुकी पाठोपाठ लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. बेळगावमधील दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर हे पद रिक्त आहे. येथील खासदारपदासाठी अनेक इच्छुकांची भाऊगर्दी आहे. बेळगावसह बसवकल्याण तसेच मस्की येथे लोकसभा पोटनिवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर तालुका पंचायत आणि त्यानंतर जिल्हा पंचायत निवडणुका होणार आहेत. त्यामुळे येत्या सहा महिन्याच्या कालावधी हा निवडणुकीच्या वातावरणाचाच असणार आहे.
ग्रामपंचायत, लोकसभा, महानगरपालिका, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत नवे उमेदवार रिंगणात उतरतात का सत्तेवर असणारेच उमेदवार पुन्हा आपले नशीब आजमाविण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरतात हे येत्या सहा महिन्यात बेळगावकरांना अनुभवायला मिळणार आहे.