बेळगाव लाईव्ह : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत नरेगा मध्ये नोंदणी केलेल्या सर्व सक्रिय कामगारांनी एनएमएमएस अॅपद्वारे ई-केवायसी अपडेट करावे, अशी माहिती जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
नरेगा योजनेत कामगारांच्या हजेरीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ई-केवायसी (जॉब कार्डसह आधार लिंक) द्वारे कामगारांची माहिती अपडेट केली जात आहे. जिल्ह्यात ५०० ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील ६,०३,६२७ सक्रिय कामगारांचे ई-केवायसी केले जात आहे.
यासाठी कामगारांनी जॉब कार्ड आणि आधार कार्ड यासारखी आवश्यक कागदपत्रे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडे उपलब्ध करून द्यावी लागतील.
जिल्ह्यात आतापर्यंत ८७८० कामगारांनी ई-केवायसीद्वारे आपली माहिती अपडेट केली आहे. सर्व नोंदणीकृत सक्रिय कामगारांनी ३१ ऑक्टोबर पर्यंत ई-केवायसी करून घ्यावे आणि अधिक माहितीसाठी संबंधित ग्रामपंचायतीला भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.



