बेळगाव लाईव्ह :गेल्या कित्येक वर्षापासून वडगाव येथील तलावांचा स्थानिक शेतकरी आपल्या गुरांना पाणी पाजण्यासाठी आणि त्यांना धुण्यासाठी वापर करत आहेत. हे लक्षात घेऊन त्यांना सोयीचे ठरेल या पद्धतीने तलावांचा विकास साधण्यात यावा, अशी मागणी वडगाव येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
विष्णू गल्ली, वडगाव येथील शेती सुधारणा युवक मंडळ तसेच नगरसेवक रवी साळुंके व माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांच्या नेतृत्वाखाली नेतृत्वाखाली शेतकऱ्यांकडून उपरोक्त मागणीचे निवेदन आज मंगळवारी सकाळी महापालिका आयुक्तांना सादर करण्यात आले.
निवेदन स्वीकारून मनपा आयुक्त शुभा बी. यांनी आपण प्रत्यक्ष पाहणीअंती योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. आम्ही वडगाव येथील शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून आमच्या भागातील तलावातील पाणी गाई, म्हशी वगैरे जनावरांना पिण्यासाठी आणि त्यांना धुण्यासाठी वापर वापरत आहोत. आमच्या वडगाव परिसरातील गुरांची संख्या जवळपास 500 इतकी आहे. या गुरांसाठी पाण्याची नितांत गरज असते. सद्यस्थितीत विहिरींना पाणी नाही. महापालिकेतर्फे केला जाणारा पाणीपुरवठा पुरेसा नसतो. सांडपाणी मिसळत असल्यामुळे जवळच्या बळ्ळारी नाल्यातील पाणी दूषित झाले आहे. या पार्श्वभूमीवर पाण्यासाठी आम्हाला आमच्या येथील तलावावर अवलंबून राहावे लागते. तेंव्हा कृपया या तलावांचा विकास साधताना तो आमच्या गुरांच्या दृष्टिकोनातून सोयीचा ठरेल याची दक्षता घ्यावी, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.
आपल्या मागणीसंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना शेती सुधारणा युवक मंडळाच्या एका पदाधिकाऱ्याने वडगाव येथे तीन तलाव असून गेल्या अनेक वर्षापासून आमच्या भागातील शेतकरी या तलावांचा वापर जनावरांना पाणी पिण्यासाठी आणि त्याला धुण्यासाठी करत आहेत.
अलीकडे त्यांच्या सौंदर्यकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे ही स्तुत्य बाब आहे. या तलावांपैकी एका तलावाच्या सौंदर्य करण्याचे काम पूर्णही झाले आहे. आमची मागणी एवढीच आहे की, शेतकऱ्यांसाठी हक्काच्या असलेल्या तलावांमध्ये गुराना सहज जाऊन पोहता आले पाहिजेत. शेतकऱ्यांना गुरांना सुरक्षित धुता आले पाहिजे, या पद्धतीने तलावांचा विकास केला जावा.
थोडक्यात शेतकरी व त्यांच्या गुरांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून प्रवेश मार्ग विस्तृत ठेवून तलावांची खोलवर खोदाई न करता ठराविक खोलीपर्यंत गाळ वगैरे काढून आवश्यक तेवढा विकास साधला जावा जावा, अशी मागणी आम्ही आयुक्तांकडे केली असल्याचे सांगितले. आज निवेदन सादर करतेवेळी वडगाव येथील शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते