बेळगाव लाईव्ह : पंत बाळेकुंद्री येथे परिवहन बसमध्ये बसवाहक आणि युवतीमधील व्यक्तिगत वादाला जाणीवपूर्वक भाषिक वादाचा स्वरूप देण्याचा प्रयत्न कन्नड संघटनांनी केला. यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
पोलीस तपासादरम्यान दोषी आढळलेल्या बसवाहकावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र या मुद्द्याचे मोठे राजकारण करत कन्नड संघटनांनी मराठीचा असलेला पोटशूळ उगारण्यासाठी आंदोलन छेडत शहराची शांतता, कायदा आणि सुव्यवथा कोलांडण्याचा घाट घातला. दरम्यान ‘त्या’ तरुणीच्या कुटुंबीयांनीच नैतिकता दाखवून हा वाद वैयक्तिक असून याचा कोणत्याही भाषावादाशी संबंध नसल्याचे जाहीर करत बसवाहकावरील पॉक्सो अंतर्गत दाखल केलेली तक्रार मागे घेत असल्याचे जाहीर केले.
बेळगाव जिल्ह्यातील पंत बाळेकुंद्री येथे प्रवासादरम्यान दोन भावंडं आणि बसवाहकांमध्ये वाद झाला. या वादाला वेगळेच तोंड फुटले आणि सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला. यानंतर काही कन्नड संघटनांच्या म्होरक्यांनी महाराष्ट्रातील बसेस अडवून बसचालकांसहित बसलाही काळे फासण्याचा प्रताप केला.
यानंतर या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्येही शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकाच्या बस रोखल्या. यामुळे दोन्ही राज्यातील वातावरण तणावपूर्ण बनले. मंगळवार दि. २५ फेब्रुवारी रोजी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या नारायणगौडा गटाने बेळगावात आंदोलन छेडले. बसवाहक आणि युवतींमधील वादाला जाणीवपूर्वक भाषिक रंग देण्याचा प्रयत्न केला.
मात्र शहरातील वाढलेली तणावपूर्ण स्थिती लक्षात घेत अखेर संबंधित युवतीच्या कुटुंबीयांनीच पुढाकार घेत हा वाद भाषिक वाद नसून वैयक्तिक असल्याचे जाहीर केले. आम्ही ज्या भागात राहतो त्या भागात मराठीसहित कन्नड भाषिक आणि इतर भाषिकही गुण्यागोविंदाने राहतात. त्यामुळे या वादाला अधिक न वाढवता इथेच थांबवावा, बसवाहकावरील तक्रार आपण मागे घेत असल्याचे या कुटुंबाने जाहीर केले.
संपूर्ण घटनेदरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी योग्य भूमिका मांडत न्याय आणि अन्याय यातील फरक स्पष्ट केला. मात्र याउपरोक्त महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेना कार्यकर्त्यांवर चुकीचे आरोप करत त्यांच्यावर गुंडागर्दीचा ठपका ठेवण्याचा प्रकार कन्नडवादी संघटनांकडून करण्यात आला. घडलेल्या घटनेचा विपर्यास करून जाणीवपूर्वक सीमाभागातील परिस्थिती बिघडवून येथील शांततेला बाधा आणण्याचे काम केले गेले.
मराठी समाजाला दोषी ठरविण्याचा प्रयत्न करत खोट्या आरोपांखाली गुन्हे दाखल करण्याचा हा प्रयत्न निषेधार्ह आहे, सदर घटना हि भाषिक वादापेक्षा सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून हाताळणे अत्यावश्यक होते. मात्र नेहमीप्रमाणेच चुकीच्या पद्धतीने कन्नड संघटनांनी या घटनेचे मोठे भांडवल करत सीमाभागासह दोन्ही राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवत आपला कंडू शमवून घेण्याचा प्रयत्न केला. अखेर याप्रकरणी सदर तरुणीच्या कुटुंबीयांनीच पुढाकार घेत या वादावर पडदा टाकला.