परतीच्या पावसामुळे फुलांची आवक घटली : दरात मोठी वाढ

0
1
Flower
 belgaum

बेळगाव लाईव्ह : यंदा मान्सूनने जरी समाधानकारक हजेरी लावली असली तरी काही ठिकाणी अतिवृष्टीने पिके धोक्यात आली आहेत. अशातच परतीच्या पावसानेही पुन्हा दमदार हजेरी लावली असून कृषी उत्पादनावर याचा परिणाम जाणवू लागला आहे.

सध्या सणासुदीचा काळ असून दोनच दिवसावर खंडेनवमी आणि विजयादशमी साजरी केली जाणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात फुलांची मागणी असते. मात्र परतीच्या पावसामुळे बेळगाव फुल बाजारात अत्यंत कमी फुलांची आवक होत आहे.

अचानक आलेल्या पावसाने फुल मार्केटमधील फुलांची आवक झाली कमी झाली असून फुलांच्या दारात दुप्पटीने वाढ झाली आहे. नवरात्रोत्सवात बेळगाव फुल बाजारात मोठ्या प्रमाणात उलाढाल होते.Flower

 belgaum

मात्र पावसामुळे अवाकच मंदावल्याने दरदेखील वाढले आहेत. उत्तर कर्नाटकातील मोठे फुल मार्केट बेळगावात असून कोंकण, गोव्यासह महाराष्ट्रात देखील बेळगावतूनच फुले निर्यात केली जातात.

दसऱ्याला विशेष झेंडूच्या फुलांना मागणी असते. मात्र झेंडूच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नवरात्रीतील १० दिवसांसह दसऱ्याला झेंडूच्या फुलांचे महत्त्व अधिक असते. पूजेबरोबरच घराला तोरण हे झेंडूच्या फुलांचेच असते.

वाहनांनाही झेंडूच्या फुलांचे हार घातले जातात त्यामुळे फुलांची मागणी वाढते. याच पार्श्‍वभूमीवर झेंडू उत्पादक शेतकरी हे दसऱ्याच्या तोंडावर फुले येतील, असे नियोजन करत असतात. याच काळात मात्र परतीच्या पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच दसऱ्याला लागणारी झेंडूची फुलेही बाजारात भाव खात आहेत. घटस्थापनेच्या आधी झेंडू ३० ते ४० रुपये किलोने विकला जात असला, तरी नवरात्रीत याच झेंडूला दुप्पट भाव शेतकऱ्यांना मिळणार आहे.

बाजारात याची किंमत आकारानुसार १००-१५०-२०० प्रतिकिलो अशी झाली आहे. साहजिकच दसऱ्याच्या दिवशी झेंडूची फुलेही मोठा टप्पा पार करतील, असा अंदाज आहे.

बेळगाव ही फुलांची मुख्य बाजारपेठ असून, येथून आसपासच्या भागात फुलांची विक्री केली जाते. बेळगावपासून काही अंतरावर असणाऱ्या कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात फुले पाठविली जातात. गोवा, सावंतवाडी, कुडाळ, मालवण, देवगड, कणकवली, रत्नागिरी, कारवार या भागामध्ये फुलांना मोठी मागणी असते.

बेळगावमध्ये बेंगळूर, तुमकूर, हावेरी, चित्रदुर्ग तसेच बेळगाव जिल्हय़ातील यरगट्टी भागातून फुलांची आवक होत असते. परंतु परतीच्या पावसामुळे फुल शेतीला मोठा फटका बसला आहे. यामुळे बेळगावमध्ये होणारी आवक मंदावली आहे. दसरा व दिवाळीमध्ये मोठय़ा प्रमाणात फुलांची विक्री होत असते. बेळगाव मुख्य बाजारपेठ असल्यामुळे लाखो रूपयांची उलाढाल या व्यवसायातून होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.