Sunday, September 15, 2024

/

सीमाभागात स्वार्थाचे राजकारण, तुम्हीच ठरवा मामा करणाऱ्यांना बळी जाणार का?

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष :आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा स्वार्थाचे राजकारण सीमाभागात सुरू झाले आहे. त्याची नांदी म्हणजे एका हसतमुख व्यक्तीच्या एकसष्ठी कार्यक्रम ठरला हे आता बेळगावात नवे नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी सीमावासियांच्या मतांचा वापर करण्याचे खेळ पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. हे खेळ म्हणजेच सामान्य मराठी जनतेला मामा करण्याचा प्रकार आहे. या प्रकाराला बळी पडणार की शहाणे होऊन मराठी ताकद दाखवणार हे आता जनतेलाच ठरवावे लागणार आहे.

स्वतःचे भ्रष्टाचार झाकून ठेऊन लोकमान्यता मिळवण्याचा कारभार करणारा मामा बेळगावच्या जनतेला नवा नाही. अनेक विधानसभा निवडणुकात मराठा समाजाचे उमेदवार पाडवण्यासाठी बेकी करून समाजाची शक्ती कमी करण्यात त्याचा हात कुणीही धरलेला नाही. १९८० नंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत विकृत डोक्याच्या मामाने आपले इप्सित साध्य केलेले आहे. मागच्या लोकसभा पोटनिवडणुकीत सुद्धा त्याचे घोडे भाजपकडे पाणी पिऊ लागले होते. यंदाही हेच घोडे पुन्हा भाजपच्या चाकरीत लागलेले आहे हे स्पष्ट झाले आहे. जनतेचा मनभेद करून मते फिरवायची आणि मी तुम्हाला निवडून दिले असे सांगून चाकरीत राहायचे असा त्याचा धंदा जनतेच्या लक्षात येत आहे. यावेळी भाजपच्या उमेदवाराला निवडणुकी आधीच भावी खासदार असे संबोधून त्याने आपल्या चाकरीची सुरुवात केली असून मराठी आणि मराठा समाजाचे नुकसान करण्याचा डाव रंगू लागला आहे.

मी एकटाच सीमावासियांच्या बाजूने आहे असा आभास तयार करणाऱ्या मामाचा मराठा समाजावर राग आहे. काँग्रेस सोडून अनेक पदे लाथाडून समितीच्या प्रवाहात दाखल झालेल्या आपल्या पिताश्रींना मराठ्यांनी पाडले, याची खंत त्याला आहे. यातून मराठा समाज कधीच पुढे येऊ नये या एकाच ध्येयाने तो राबत असतो. यामुळेच प्रत्येक निवडणुकीत त्याने समाजाचा बळी देऊन राष्ट्रीय पक्षांची तळी राखण्याची कामे केली आहेत. ही अभद्र कामे करून तो पुण्याच्या पांढरपेशींच्या मेळ्यात जाऊन बसतो आणि प्रत्यक्ष लाठ्या बेळगावच्या मराठ्यांना खाव्या लागतात. हे चित्र कायमचे आहे.Mes politics vidhansabha

स्वतःच्या संस्थेतला पैसा गैर मार्गाने बाहेर काढून अनेक उद्योग सुरू केलेला हा मामा नोकऱ्यांच्या आमिषाने समाजात हिरो असल्याचा दिखावा करतो. नोकरीला असलेल्या मराठा समाजातील कर्मचाऱ्यांचे शोषण करीत कमी पगारावर राबविले जाते. टार्गेट पूर्ण केले नाहीतर अमानुष बदल्या केल्या जातात. आणि नोकरीतून काढून टाकले जाते. काम करताना रक्त आटवलेल्या कामगारांची याला काहीच किंमत नाही. नोकरी सोडून जाणाऱ्यांशी नोकरीत असणाऱ्यांनी साधे बोलले तरी त्यालाही काढून टाकले जाते. असा मामा आणि त्याचे प्रशासन मराठी समाजाला भुलवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत दिखाऊपणा करत राहते.

राबणारे बाजूला आणि बेकायदेशीर कर्जे मात्र आपल्या खास चमच्यांच्या नावावर काढून उद्योग काढले जातात. असे अनेक उद्योग काढून केलेला बेकायदेशीर कारभार यापूर्वी उघडकीला आलेला आहे. हा कारभार वाचवून स्वतःला आणि बायका पोरांना होणारा कारावास टाळण्यासाठी गुजराती शेठांचे तळवे चाटण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. आणि ही हुजुरेगिरी आता लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून साध्य करण्याची या वयोवृध्द मामाची धडपड पुन्हा एकदा दिसू लागली आहे.

सामान्य जनता हुशार आहे. दरवेळी आपल्याला मामा केले जात असल्याचे त्यांच्याही लक्षात येत आहे. आपले मराठीपण देशात दिसून यायचे असेल तर अशा बाजार बुंडग्या कडून स्वतःचा मामा करून घेण्यापेक्षा आपली ताकद दाखविण्याची भावना वाढत आहे. मामाने कधीच इतरांना विशेषतः मराठा समाजाला पुढे यायला दिले नाही याची पारायणे करणारे सुद्धा आता त्याच्यासमोर मरगळ आल्यासारखे वागू लागले आहेत. ही असली अभद्र युती समाजाला आणि त्यांच्या अस्मितेला विकून फक्त पैसा आणि भ्रष्टाचार वाचविण्यासाठी आहे…. हे लक्षात आले असेल तर मनभेद करणाऱ्यांना वेळीच त्यांची जागा दाखवायला मराठा समाज सज्ज होणे गरजेचे आहे….. लोकसभा निवडणुकीत सर्वांना स्वातंत्र्य देऊया असे सांगून एका बाजूने भाजपचा आणि दुसऱ्या बाजूने काँग्रेसचा पैसे खाऊन जनतेला मामा करणाऱ्यांचा डाव वेळीच ओळखणे गरजेचे आहे. यावर तुमची प्रतिक्रिया महत्त्वाची आहे….. उठ मराठ्या जागा हो….. क्रांतीचा एक धागा हो….

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.