बेळगाव लाईव्ह विशेष :लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय पक्षांच्या चाकरीला सुरुवात झाल्याचे लक्षात येत आहे. विशेषतः हिंदुत्वाच्या जोरावर मराठी माणसाची मते गोळा करून पुढे मराठीवर हल्ले झाल्यावर जे हात वर करतात त्यांच्या बाजूने मराठी माणसाला झुकवण्याची कामे सुरू झाली आहेत. मराठी माणसाचे मुखपत्र म्हणवून घेणाऱ्यांनी यामध्ये आघाडी घेतली असून या मुखपत्राचे झुकपत्र कधी झाले हेच कळाले नाही. अशी सामान्य मराठी माणसांची प्रतिक्रिया आहे.
या झुक पत्राच्या चालकांनी अंतर्गत सेटलमेंट करताना बेळगावातल्या मराठी भाषिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. भोळ्या भाबड्या जनतेला पूर्वी हे आतील साटेलोटे आणि स्वार्थी व्यवहार कळत नव्हते. एकाद्या कार्यकर्त्याने अथवा नेत्याने ते उघड करण्याचा प्रयत्न केला तर त्याला गद्दार ठरवून देशोधडीला लावण्यात यायचे. काही चमच्यांना हाताशी धरून लोकसभा असो वा विधानसभा निवडणूक असो राष्ट्रीय पक्षांशी संधान साधायचे आणि सामान्य माणसाला अंधारात ठेऊन आपले धंदे वाढवायचे असली झुकेगिरी पूर्वापार चालत आली आहे. पूर्वी लोकांच्या डोक्यात भावनेचा पाझर फोडून आपण सांगतोय तेच खरे असे बिंबवण्यात आले होते. आता मात्र तसे मानणारे कमी झाले किंवा संपून गेले आहेत.
दहा पंधरा जणांची फुकट नाष्टा करणारी हाफ चड्डी गँग सोडली तर बाकीचे किंमत देईनासे झाले आहेत. सोशल मीडिया आल्याने कुणालाही व्यक्त होता येऊ लागले. याचा परिणाम दिसत असल्याने पूर्वीच्या विरोधकांना पैशांची आमिषे दाखवून कवटाळण्याचा नवा डाव सुरू झाला. गेल्या विधानसभेला त्याचा पहिला प्रयोग यशस्वी करण्यात आला आणि आता लोकसभेला भाजप समोर सारा समाज झुकवण्याचा डाव शिजू लागला आहे. मात्र हे कारनामे उघड होऊ लागल्याने डाळ शिजणे अवघड आहे.
समाजात प्रचंड लोकमान्यता मिळवण्यासाठी प्रचंड पैसा ओतावा लागतो. हे या झुकपत्राच्या चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांना सगळेच मार्ग चालू लागले. इतरांना निष्ठेचे डोस देत देत आपण मात्र लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि आपण कोरडे पाषाण असे वागण्यावर सद्याचा भर आहे. निष्ठा दावणीला बांधून ते कधी झुक पत्र झाले हेच कळले नाही. आता सगळीकडे झुकून पाय धरायचे आणि पायातील जोडवी काढून घ्यायची असे या झुकपत्राचे धोरण बनले आहे, हे सगळ्यांच्याच लक्षात आले आहे.
काळा दिवस जगाला पाळायला लावायचा आणि त्याच दिवशी सत्ताधाऱ्यांचे जखमेवर मीठ चोळून हसणारे फोटो छापायचे ही दुटप्पी भूमिका या झुकपत्राने जपली आहे. लाठ्या काठ्यांनी झोडपलेल्या समाजाला चुचकारून मगरीचे आसू गाळायची. समाजाला नियमितपणे मामा करीत राहायचं धोरण या झुकपत्राने जपलं आहे.
या लढ्यात भरडल्या गेलेल्या समाजाशी सुख दुःख नाही. कुणाच्या हाल आणि कष्ट यांची कदर नाही. लढा आणि जन भावना वापरून खोऱ्याने पैसा ओढत राहायचा. पुन्हा या प्रश्र्नापाई आपण कसे भिकारी झालो याचे खोटे किस्से सांगून कामगारांचे शोषण करीत राहायचे. आणि ज्यांना गल्लीतले कुत्रेही विचारत नाही अशा चांडाळ चौकडी ला घेऊन आपलं राजकारण रेटत राहायचं एवढंच काम या झुक पत्राने केलेलं आहे. काहीकाळ बाजूला फेकल्या गेलेल्या या चौकडीनी पुन्हा उसण्या शेकोटिवर आपल्याला जगवणाऱ्या मामाला ऊब देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
समाजाला अंधारात ठेऊन काही तुकडे चघळण्याची एकदा सवय झाली की माणूस सन्मानाने जगण्याची आशा सोडून देतो, अशीच अवस्था झुकपत्र चालकांच्या त्या चौकडीचीही झाली आहे. चालकाला जागे केले की पुन्हा तुकडे मिळणार या आशेने मग वेगवेगळे सत्कार कार्यक्रम ठरू लागले आहेत. लोकांना मामा करणाऱ्यांना आता पुन्हा बॅगा, पैसे आणि नोटा याची स्वप्ने पडू लागली आहेत. यातूनच मग भावी खासदारांच्या घोषणा करण्यापर्यंत या मंडळींची धाव जाऊ लागली आहे.
लोकसभा निवडणूक जस जशी जवळ येईल तसे हे झुकपत्र स्वतःला झुकवणार आहे आणि आपल्या बरोबरच समाजाला झुकवण्याचे षडयंत्र सुरू राहणार आहे. मामा मामा चा गजर करणारी पिलावळ आपले फोटो आणि चगळायला तुकडे मिळणार म्हणून संपूर्ण मराठी माणसाच्या अस्मितेची चेष्टा करणार आहे हे डाव वेळेत ओळखले नाहीत तर पुन्हा एकदा समाजाला दुर्दैवाचे दशावतार भोगायला लावणारी ही झुक पत्राची टीम आणि त्यांचा नेता समाजाला मामा करेपर्यंत आपण शांत राहणार आहात का? समाजाला आजच ठरवावे लागेल…. अन्यथा वेळ गेलेली असेल.
‘भीकपत्रा’चा हटवादीपणा उद्या वाचा फक्त बेळगाव live वर…