बेळगाव लाईव्ह : बुधवारी सकाळी बेळगाव शहर परिसराला अवकाळी पावसाने झोडपले त्यामुळे या कापणी झालेल्या भात पिकाला धोका निर्माण झालाय तर पावसाच्या ओलीने आगामी रब्बी पिकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्यावर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी सुक्या दुष्काळाने शेतकरी पूरता संकटात सापडला असतानां कांही शेतकऱ्यांनी गेल्या व यावर्षी विमा उतरवूनही भरपाई न मिळाल्याने व सरकारची तुटपूंजी भरपाई पाहिल्यास एक वेळची मशागतही होत नाही अशी परिस्थिती आहे.
यावर्षी ऐन खरिप हंगामात तसेच पीकांना बहर येण्यावेळीच पावसाने दडी मारल्याने पीकांची वाढ व पोसवणीच खुंटल्याने शेतकरी दुखी कष्टी झाला आहे भात पिकाचे नुकसान झाले आहे. केवळ इंद्रायणी आणि बासमती भात पीक आले आहे याव्यतिरिक्त सर्व भाते खराब झाली आहेत त्यामुळे यंदा मळण्या देखील कमीच आहेत.
छोट्या शेतकऱ्यांनी आशेने आपल्या घरचे दागिने गहाण ठेऊन मशागत,खतं,पेरणी केली पण ऐनवेळीच पाऊस नसल्याने भातपीकांसह इतर पीकं गेली.तरिही सरकारने बेळगाव,खानापूर तालूका दुष्काळग्रस्त घोषित केला नव्हता. त्यासाठी शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पीकं दाखवत आंदोलनं केल्यावर दुष्काळ जाहिर झाला.पण शेतकऱ्यांना सरकारने वाटाण्याच्या अक्षता दाखवत भरपाई वितरित केली ती अनेकांना अजून मिळालीच नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
क्वचित शेतकऱ्यांना चारदाने मिळतील म्हटल्यावर आजच्या पावसाने कापणी केलेल्या भातपीकांवर मोठा पाऊस झाल्याने ती झडून जातात किंवा आणखी पाऊस झाल्यास तिथेच परत मुळके सुटल्याने तोडांशी आलेले दोन घासही जाण्याची शक्यता आहे.राज्य सरकारने पीकविमा रक्कम खात्यात जमा करावी अशी मागणी या निमित्ताने वाढू लागली आहे.