बेळगाव लाईव्ह : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी बेळगावच्या विद्यमान खासदार मंगला अंगडी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा अधिक आहे कारण असे आहे की बेळगाव भाजपमधील अनेकजण इच्छुक दिल्लीवाऱ्या करू लागलेले आहेत.
दिल्ली मधल्या भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांच्या भेटीगाठी करणे चर्चा करणे लॉबिंग करणे हे बेळगावच्या भाजप नेत्यांकडून आतापासूनच सुरू झाले आहे. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी माजी आमदार संजय पाटील, महांतेश कवटगीमठ शंकर गौडा पाटील अनिल बेनके किरण जाधव यांच्यासह अनेक इच्छुकांनी आता पासूनच दिल्लीवाऱ्या करायला सुरुवात केली असून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे माजी मंत्री आणि गोकाकचे विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी आणि त्यांचे बंधू अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी या दोघातील एकट्याला बेळगाव लोकसभेची उमेदवारी देण्याबाबत हाय कमांड मध्ये खलबत्ते सुरू असल्याचे समजते.
‘कोणत्याही परिस्थितीत मी भाजप सोडणार नाही’ असं वक्तव्य केल्यानंतर रमेश जारकीहोळी यांना भाजप हाय कमांडने बेळगाव लोकसभेच्या तिकीट साठी गळ घातला आहे का? याची देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.
सध्या बेळगाव जिल्ह्यात काँग्रेसला बळकटी मिळत असताना मागील अडीच वर्षापूर्वी थोडक्यात जिंकलेली लोकसभा पोटनिवडणुक, त्यानंतर विधान सभेत झालेली भाजपची पिछेहाट त्यामुळे पुढील वर्षी बेळगाव लोकसभेची जागा राखण्यासाठी आत्तापासूनच भाजपच्या नेत्यांनी कंबर कसल्याचे दिसून येत आहे.
भाजपचे रमेश किंवा भालचंद जारकीहोळी यांना उमेदवारी दिल्यास भाजप सहज जिंकू शकते अशी गोळा बेरीज भाजप हाय कमांड करत आहे त्यामुळे जारकीहोळी बंधू मधील एकजण भाजप कडून निवडणूक लढवणार का? याची जोरदार चर्चा सुरू आहे.