बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघापैकी ११ मतदार संघात काँग्रेसने बाजी मारली असून बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात काँग्रेस स्वबळावर सत्ता स्थापन करणार आहे.
आपल्या जबाबदारीवर उमेदवार निवडण्याची आणि विजयी करण्याची जोखीम उचलून बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणात किंगमेकर ठरलेले सतीश जारकीहोळी यांनी आपल्या विजयासह बेळगाव जिल्ह्यातील इतर काँग्रेस उमेदवारांच्या विजयाची पताकाही फडकाविली असून यमकनमर्डी मतदार संघात सतीश जारकीहोळी यांनी १००२९० मताधिक्याने यमकनमर्डी मतदार संघावर आपलेच वर्चस्व आहे, हि बाब अधोरेखित केली आहे.
भाजपकडून उमेदवारी देण्यावरून सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडीत माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आडकाठी केली होती. आपण सुचवलेल्या उमेदवारांनाच संधी देण्याची मागणी त्यांनी हायकमांडकडे उचलून धरली होती. मात्र बहुतांशी ठिकाणी रमेश जारकीहोळी समर्थकांना पराभव पत्करावा लागला असून बेळगावमध्ये सर्वाधिक जागांवर काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
बेळगाव जिल्ह्यातील अरभावी मतदार संघात २८४३१ मते घेऊन भालचंद्र जारकीहोळी विजयी ठरले आहेत तर अथणीमधून माजी उपमुख्यमंत्री काँग्रेस उमेदवार लक्ष्मण सवदी हे १३१४०४ इतक्या मताधिक्याने विजयी ठरले आहेत. बागलकोटमधून काँग्रेसचे हुल्लप्पा मेटी हे ७९३३६ मतांनी तर बैलहोंगल मतदार संघात काँग्रेसचे महांतेश कौजलगी यांनी ५७७८३ मतांनी बाजी मारली आहे.
सीमाभागातील चार मतदार संघांपैकी दोन जागा भाजपाकडे तर दोन जागा काँग्रेसकडे आल्या असून दक्षिण मतदार संघात अभय पाटील यांनी ७७०९४ मते तर खानापूरमधून विठ्ठल हलगेकर यांनी ९१८३४ मते घेत विजय प्राप्त केला आहे. तर ग्रामीणमध्ये काँग्रेसच्या विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी १०७६१९ मतांचा टप्पा गाठत एकहाती सत्ता मिळविली आहे तर केवळ २००० मतांच्या फरकाने असिफ सेठ उत्तर मतदार संघातून ५५९३९ मते मिळवत विजयी ठरले आहेत.
काँग्रेसच्या वतीने चिकोडी सदलगा मतदार संघात गणेश हुक्केरी यांनी १२८३४९ मते मिळवून विजयाची हॅटट्रिक साधली आहे. तर कागवाड मधून भरमगौडा कागे यांनी ८३३८७ मते मिळवून विजय प्राप्त केला आहे. कित्तूर मधून बाबासाहेब पाटील यांनी ७७५३६ मते तर कुडची मधून महेंद्र तम्मण्णावर यांनी ८५३२१ मते घेत बाजी मारली आहे.
निपाणी मतदार संघात विद्यमान आमदार शशिकला जोल्ले यांनी तिसऱ्यांदा विजयी पताका फडकाविली असून अखेरच्या क्षणापर्यंत झुंझ देत ७३६२५ मते घेऊन पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले आहे. रामदुर्ग मध्ये काँग्रेसचे अशोक पट्टण यांनी ७८०५५ मते घेत विजय मिळविला आहे तर रायबागमधून भाजपचे विद्यमान आमदार यांनीदेखील दुर्योधन ऐहोळे यांनी विजयाची हॅटट्रिक साधली असून ५७५०० मतांनी त्यांनी बाजी मारली आहे. सौंदत्ती यल्लम्मा मतदार संघात काँग्रेसचे विश्वास वैद्य यांनी ७१२२४ मतांनी विजय मिळविला आहे.