सध्या शाळा महाविद्यालयात पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना तासंतास बसची प्रतीक्षा करावी लागत असून कााही वेळेला त्यांचे क्लासही चुकत आहेत. हे सर्व वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या जिल्ह्यांतर्गत खराब बससेवेमुळे घडत आहे.
परिवहन मंडळामधील कर्मचाऱ्यांची कमतरता आणि बस गाड्यांच्या खराब अवस्थेचा बेळगाव आणि चिक्कोडी विभागातील बस सेवेवर प्रतिकूल परिणाम झाला असून याचा फटका या जिल्ह्यातील शाळा -महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या पासधारक तसेच बिगर पासधारक सुमारे 1.50 लाख विद्यार्थ्यांना बसत आहे.
खराब बस सेवा ही सध्या शिक्षण खात्याची डोकेदुखी झाली नाही तर पालकांचीही झाली आहे. कारण तासंतास बसच्या प्रतीक्षेत थांबणाऱ्या आपल्या मुलांना त्या काळात काही वाईट सवयी तरी लागणार नाहीत ना? अशी भीती पालकांना वाटत आहे.
बसेसची संख्या कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांना नाईलाजाने धोका पत्करत प्रवाशांची गर्दी असलेल्या बस गाड्यांतून प्रवास करावा लागतो. फक्त विद्यार्थ्यांनाच नव्हे तर शाळा आणि महाविद्यालय भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेला प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या बसमधून प्रवास करण्याची जोखीम सर्वांनाच पत्करावी लागते आहे. कोरोना प्रादुर्भावानंतर देखील परिवहन बस सेवा खराबच आहे. वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या (एनडब्ल्यू केआरटीसी) सूत्राने दिलेल्या माहितीनुसार कोरोना पूर्वकाळात चिक्कोडी विभागात 642 बसेस कार्यरत होत्या.
आता कोरोना प्रादुर्भावानंतर त्यांची संख्या 601 इतकी करण्यात आली आहे. जवळपास हीच परिस्थिती बेळगाव विभागाची देखील आहे. कोरोनापूर्वकाळात 695 मार्गांवर बसेस धावत होत्या, परंतु कोरोनाच्या लाटा निवडल्यानंतर त्यांची संख्या कमी होऊन सध्या 653 मार्गांवर बसेस धावत आहेत.
या बदलाचा परिणाम हा झाला आहे की सध्या नियमित बसेवेच्या मागणीसाठी बेळगाव जिल्ह्याच्या विविध भागात विद्यार्थ्यांना आंदोलने करावी लागत आहेत. अधिकाऱ्यांच्या मते बससेवा अनियमित होण्यास विविध कारणे आहेत. पहिले कारण हे की परिवहन मंडळाच्या दोन्ही विभागाकडे पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध नाही. दुसरं बेळगाव विभागात धावणाऱ्या बसेस खूप जुन्या झाल्या असून त्यांना सातत्याने दुरुस्ती व देखभालीची गरज आहे.
नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधिमंडळ अधिवेशन कालावधीत 60 बसेस अधिवेशनासाठी नियुक्त पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांच्या दिमतीला देण्यात आल्यामुळे या काळात बसेसचा तुटवडा अधिकच तीव्र झाला होता. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी नुकतीच एनडब्ल्यू केआरटीसी अधिकाऱ्यांची बैठकी घेतली होती. या बैठकीत बस सेवेच्या समस्येवर तात्काळ तोडगा काढण्याची सूचना वरिष्ठ परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.