Saturday, July 27, 2024

/

‘हर घर तिरंगा’!.. तिरंगा फडकावताय? तर मग हे नक्की वाचा!

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : स्वतंत्र भारताच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ हे अभियान पुकारले आहे. १३ ते १५ ऑगस्ट या दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकवावा असे आवाहन सरकारने जनतेला केले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ध्वजसंहितेतील कापडासंदर्भात काही नियम बदलले असले तरीही ध्वजसंहितेनुसार प्रत्येकाने फडकविण्याचे नियम पाळणे अत्यंत महत्वाचे आहे.

२० जुलै २०२२ ला केलेल्या सुधारणेनुसार आता राष्ट्रध्वज दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेला फडकावता येईल. मग तो खुल्या जागेवर किंवा घरावर असेल तरीही तो फडकावण्याची परवानगी देण्यात आली आहे. या आधी राष्ट्रध्वज सूर्योदय ते सूर्यास्त या काळातच फडकावण्याची परवानगी होती. तसेच ३० डिसेंबर २०२१ ला केलेल्या बदलानुसार पॉलिस्टरच्या कापडाचा ध्वज तयार करण्याची परवानगी दिली होती. याआधी फक्त खादीच्या कापडाचा ध्वज तयार करण्याची परवानगी होती. हे दोन बदल ध्वजसंहितेत करण्यात आले आहेत.

अनेकांनी आपल्या सोशल मीडिया प्रोफाईलवर तिरंगा ध्वजचे फोटो लावले आहेत. मात्र घरावर झेंडा फडकवायला असेल तर त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात हे प्रत्येकाला माहित असणे अत्यावश्यक आहे.

* भारताची ध्वजसंहिता काय आहे? : राष्ट्रध्वज फडकावण्यासाठी ध्वजसंहिता २००२ चे पालन करणे तसेच राष्ट्रीय प्रतिक अपमान विरोधी कायदा १९७१ चेही पालन करणे गरजेचे आहे.
* ध्वजसंहितेच्या २.१ या कलमानुसार सामान्य नागरिकांना राष्ट्रध्वजाचा पूर्ण मान ठेवून कोणत्याही ठिकाणी ध्वज फडकावण्यावर बंदी नाही. मात्र राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यास मात्र तीन वर्षं तुरुंगवास आणि पहिल्यांदाच गुन्हा केल्यास दंड करण्याची तरतूद आहे.

* राष्ट्रध्वज फडकावताना कोणत्या गोष्टी ध्यानात घ्याव्यात? : सरकारची ध्वजसंहिता याआधी अतिशय कडक होती. आता ती बऱ्यापैकी शिथिल करण्यात आली आहे. तरीही राष्ट्रध्वज फडकावताना खालील गोष्टी लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे.Har ghar tirangaa

१ . ध्वज फडकावताना तो फाटलेला, मळलेला किंवा चुरगळलेला नसावा. तो व्यवस्थित ठिकाणी फडकावावा.
२ . भारताच्या राष्ट्रध्वजाच्या ज्या उंचीवर फडकावला आहे त्याच्या बरोबरीच्या लांबीवर किंवा त्यापेक्षा उंचीवर कोणताही इतर ध्वज फडकावू नये.
३ . कोणत्याही प्रकारच्या सजावटीसाठी ध्वजाचा वापर करू नये.
४ . ध्वज फडकावताना नारंगी (केसरी) रंग वर राहील याची दक्षता घ्यावी.
५ . ध्वजस्तंभावर किंवा ध्वजाच्या वर, फुलं, पानं, फुलांचे हार ठेवू नये.
६ . ध्वजावर काहीही लिहू नये तसेच कोणतीही वस्तू झाकण्यासाठी त्याचा वापर करू नये.
७ . ध्वजारोहणासाठी झेंडा तयार करताना त्यात फुलं गरज असल्यास ठेवता येतील.
८ . राष्ट्रध्वज फरशीवर पडलेला नसावा, तसंच पाण्यावर तरंगलेला नसावा.
९ . कोणत्याही प्रकारच्या वेशभूषेवर, ध्वजाचा वापर करू नये. तसंच तो कमरेच्या खाली गुंडाळू नये. रुमाल, सोफ्याचे कव्हर, नॅपकिन, अंतरवस्त्रं यासाठी कापड म्हणून त्याचा वापर करू नये.
१० . जेव्हा ध्वज फडकावतो तेव्हा तो ध्वजस्तंभाच्या उजव्या बाजूला असावा.

‘हर घर तिरंगा’ अभियानाबद्दल थोडक्यात….
केंद्र सरकारने या अभियानाअंतर्गत २० कोटी घरांवर झेंडा फडकावण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. ‘कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ यांच्या मते भारतात सध्या ४ कोटी झेंडे उपलब्ध आहे. म्हणजे इतर झेंड्याची ऑर्डर केंद्र सरकारला त्यांच्या स्तरावर बनवून विक्री करून विशिष्ट जागी पोहोचवाव्या लागतील. राज्य सरकार केंद्र सरकारकडून त्यांच्या गरजेनुसार झेंड्याची मागणी करू शकतात. किंवा राज्यपातळीवर झेंड्याची व्यवस्था करू शकतात. केंद्र सरकारने सांगितल्यानुसार झेंडे तीन वेगवेगळ्या आकारात उपलब्ध असतील. त्यांची किंमत ९, १८ आणि २५ इतकी असेल.

केंद्र सरकारच्या आवाहनानुसार ज्या नागरिकांनी यंदाच्या स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकविण्याचे ठरविले असेल तर त्यांनी वरील ध्वजसंहितेचे अवश्य पालन करावे.

बेळगावच्या जिल्हाधिकारी यांचे आवाहन

13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय इमारती, अंगणवाडी व पंचायत इमारतींवर दररोज सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करावे. .सूचनांचे काटेकोर पालन करून जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करावे असे आवाहन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.