बहुजन समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाई दाजीबा देसाई यांनी केलेले कार्य अविस्मरणीय आहे असे गौरवोद्गार कोल्हापूरचे प्रा. डॉ. जी. पी. माळी यांनी काढले.
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ आणि भाई दाजीबा देसाई प्रतिष्ठान यांच्या वतीने शनिवारी बेळगावात भाई दाजीबा देसाई यांचा ३७वा स्मृतिदिन कार्यक्रम पार पडला. प्रारंभी भाई दाजीबा देसाई यांच्या स्मृतिस्थळाला पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्यात आली.
त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव प्रा. विक्रम पाटील यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले. त्यानंतर प्रा. डॉ. एम. व्ही शिंदे यांनी परिचय करून दिला. त्यानंतर मंडळाच्या आदर्श शाळा पुरस्कारांचे पाहुण्यांच्याहस्ते वितरण करण्यात आले.
यावेळी ‘भाई दाजीबा देसाई कार्य व कर्तृत्व’ या विषयावर बोलताना बोलताना प्रमुख वक्ते प्रा. डॉ. जी. पी. माळी म्हणाले, भाई दाजीबा देसाई यांचे कार्य व कर्तृत्व उत्तुंग होते. बहुजन समाजाने शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, नावारूपाला यावे ही त्यांची तळमळ होती. त्यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील राहिले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा एवढा मोठा विस्तार झाला आहे. भाई दाजीबा देसाई यांच्या कार्याचा वसा ही संस्था पुढे चालवीत आहे ही समाधानाची बाब आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी भाई दाजीबा देसाई प्रतिष्ठानचे विश्वस्त ऍड. राजाभाऊ पाटील यांचे अध्यक्षीय भाषण झाले. ज्योती पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. शेलार यांनी आभार मानले. यावेळी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ आणि भाई दाजीबा देसाई प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य, प्राध्यापक, शिक्षक, विध्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.