महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये फूट पडली आहे. हि फूट केवळ निवडणुकीमुळे पडत असून गेल्या ६४ वर्षांपासून सुरु असलेली सीमाप्रश्नाची तळमळ निवडणुकीमुळेच बाजूला सरत असून सीमाप्रश्नाचा विसर प्रत्येकाला पडत आहे. यामुळे यापुढील काळात समितीने निवडणूक न लढवता केवळ सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रयत्नशील राहावे, असे विचार महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांनी व्यक्त केले. मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
मागील वेळी प्रशासनाने मोर्चा स्थगित करण्याची विनंती केली होती. प्रशासन नेहमीप्रमाणे वेळकाढूपणा करत असून प्रत्येक वेळी समिती आणि मराठी भाषिकांची निवेदनांना जिल्हाधिकारी कार्यालयात ‘केराची टोपली’ दाखविली जाते. केवळ आश्वासने आणि चर्चा करून मराठी भाषिकांच्या लढ्याची दिशा भरकटविण्यात येते. परंतु आता प्रशासनाला कोणतीही संधी न देता आपल्या हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी पुन्हा एकदा महामोर्चा आयोजित करण्याची मागणी त्यांनी मध्यवर्तीकडे केली. या बैठकीत प्रामुख्याने मनपासमोर फडकविण्यात आलेला लाल – पिवळा हटविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. येत्या ८ मार्च रोजी पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात दुटप्पी प्रशासनाला मागील वेळेपेक्षा दुप्पट पद्धतीने मोर्चाचा प्रचार आणि प्रसार करून मोर्चा मोठ्या प्रमाणात यशस्वी करू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
समिती नेत्यांच्या एकीसंदर्भात बोलताना शुभम शेळके म्हणाले कि, मराठी भाषिकांच्या लढ्यासाठी कोणताही समिती नेता लढताना पहावयास मिळत नाही. केवळ पदाच्या हव्यासापोटी महाराष्ट्र एकीकरण समितीशी बांधिलकी दाखवून एकदा पद मिळाले कि मराठी भाषिक आणि सीमाप्रश्नाकडे पाठ फिरविणारे अनेक नेते आहेत. अशा नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखविणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी म्हणून समितीच्या नावावर निवडून आलेले आज किती जण समितीशी जुळले गेले आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पद भोगलेल्या नेत्यांपेक्षा आजतागायत सामान्य कार्यकर्तेच समितीशी जोडले गेले आहेत. कित्येकजण समिती नेत्यांवर टीका करतात. परंतु स्वतःचे समितीसाठी कोणते योगदान आहे? हा प्रश्न प्रत्येकाने तपासणे गरजेचे आहे. विविध माध्यमातून बैठक होत असताना एकीची मागणी करण्यात येते.