शहरातील ठिकठिकाणच्या नाक्यांवर कागदपत्रांच्या तपासणीसाठी आमची वाहने अडवून स्थानिक पोलिस आम्हाला प्रचंड त्रास देत आहेत, असा आरोप गेल्या कांही दिवसांपासून बेळगांवात दिवाळीच्या खरेदीसाठी येणाऱ्या गोव्यातील लोकांकडून केला जात आहे.
बेळगांवच्या रहदारी पोलिसांनी अलीकडे कांही दिवसांपासून वाहने अडवून विशेषता शहरात येणारी परराज्यातील वाहने अडवून कागदपत्रे तपासणीची मोहीम सुरू केली आहे. खानापूर रोड, ध. संभाजी चौक, कित्तूर राणी चन्नम्मा चौक आदी ठिकाणी पोलिसांकडून ही तपासणी केली जात आहे.
वास्को-द-गामा (गोवा) येथील रिचर्ड डिसुझा बेळगांवात खरेदीसाठी आले आहेत. ते म्हणाले की, माझ्या गाडीची सर्व कागदपत्रे व्यवस्थित असून देखील मला सुमारे अर्धा तास अडवून ठेवण्यात आले होते. मी त्याबद्दल जाब विचारला असता संबंधित पोलिसांनी मला न कळणाऱ्या कन्नड भाषेत उडवाउडवीची उत्तरे दिली. गोव्यातील साखळी गांवच्या सुधीर देसाई यांना देखील डिसुझा यांच्याप्रमाणेच अनुभव आला आहे. बेळगांवचे पोलीस आम्ही जणू गुन्हेगार असल्याप्रमाणे आमच्याशी बोलतात आणि विनाकारण आमची अडवणूक करतात. त्यामुळे आता माझे बरेचसे मित्र बेळगावला भेट देणे टाळत आहेत, असे सुधीर देसाई यांनी सांगितले.
दरम्यान पोलिस उपायुक्त सी. आर. निलगार यांनी वाहनांची कागदपत्रे तपासणी करून विशेषता परराज्यातील वाहनांची कागदपत्रे तपासणी करून पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत. संभाव्य गुन्हेगारी कारवायांना आळा बसावा हा यामागील उद्देश आहे.
कारण बेळगांवात येणारी परराज्यातील वाहने चोरीची असू शकतात किंवा त्या वाहनांमध्ये अवैध माल असू शकतो. तथापि वाहनांच्या कागदपत्र तपासणीप्रसंगी लोकांशी सौजन्याने वागा अशी सूचना आपण रहदारी पोलिसांना निश्चितपणे देऊ, असेही पोलीस उपायुक्त निलगार यांनी स्पष्ट केले.