लॉक डाऊनच्या काळात आवश्यक ती खबरदारी घेऊन राज्यातील सब रजिस्ट्रार अँड मॅरेज कार्यालये सुरू ठेवण्याचा आदेश राज्य सरकारने काढला आहे. मात्र या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावून बेळगाव येथील सब रजिस्ट्रार कार्यालय अद्यापही बंद ठेवण्यात आले असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे हे कार्यालय केंव्हा सुरू होणार याकडे संबंधित नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन असले तरी राज्यातील सर्व सब रजिस्ट्रार अँड मॅरेज ऑफिस अर्थात उपनोंदणी आणि विवाह नोंदणी अधिकारी कार्यालये आवश्यक ती खबरदारी घेऊन जनतेसाठी खुली करण्याचा आदेश सरकारने नुकताच बजावला आहे. बेळगाव येथे मात्र या आदेशाची अद्यापपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करून उपनोंदणी आणि विवाह नोंदणी कार्यालयातील कामकाज पुनश्च सुरू केले जावे, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.
सरकारी नियमानुसार उपनोंदणी आणि विवाह नोंदणी कार्यालयामध्ये दररोज किमान तीन नोंदी तरी व्हावयास हव्यात. तथापि बेळगाव येथील संबंधित कार्यालयाला अद्यापिही कुलूप ठोकण्यात आलेले असल्यामुळे दररोज किमान तीन नोंदणीचा नियम निकालात निघाला आहे.
सदर कार्यालय बंद असल्यामुळे नोंदणी अभावी नागरिकांची पुढील महत्वाची कामे खोळंबली असून त्यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे सरकारचा आदेश डावलून बेळगावचे उपनोंदणी आणि विवाह नोंदणी कार्यालय शुक्रवारी देखील बंद असल्यामुळे सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.