अनेकांची डोकेदुखी ठरणारा आणि या रस्त्यावरून जाताना शंभर वेळा विचार करायला लावणारा रस्ता म्हणजे एपीएमसी ते अलतगा. डोकेदुखी हा रस्ता म्हणून परिचित आहे. हा रस्ता कधी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. मात्र नुकतीच सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र हे काम संथ गतीने सुरू असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मागील अनेक वर्षापासून या रस्त्याचे काम करणार करणार असे आश्वासन देण्यात येत होते. मात्र लोकप्रतिनिधी आणि काही अधिकाऱ्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले होते. त्यामुळे नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत होती. या रस्त्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात आले. रास्ता रोको करण्यात आला. तरीदेखील या रस्त्याचे काम हाती घेण्यात दिरंगाई करण्यात आली होती. आता काम सुरू करण्यात आले आहे. मात्र ते संथ गतीने सुरू असल्याने अपघाताची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
एपीएमसी ते अलता क्रॉस पर्यंतच्या रस्त्यासाठी वारंवार निवेदने आंदोलने मोर्चे काढण्यात आले. तरी देखील प्रशासनाला जाग आली नव्हती. मात्र पुन्हा आंदोलनाचा इशारा देताच या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या वर्षी झालेल्या महापुरामुळे या रस्त्याचे काम काही दिवस उशीरा सुरू करण्यात आले आहे. मात्र उशिरा का होईना रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत होते. मात्र या कामाला संथ गती मिळाल्याने संतापही व्यक्त करण्यात येत आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याला हा रस्ता करण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. मात्र कंग्राळी खुर्द येथे नुकतीच यात्रा उत्सव झाला. यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक होती. तर काही अपघात या रस्त्यावर घडले आहेत. खडी टाकून त्यावर डांबरीकरण करण्यात आल्याने या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने तसे पाहता काही दिवसांत हा रस्ता करण्याची गरज होती. मात्र सावकाश आणि कासवाच्या गतीने या रस्त्याचे काम सुरू असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे रस्ता करण्याचे केवळ नाटक करण्यात आल्याचेही प्रयत्न सुरू असल्याचे सध्या बोलले जात आहे.