गेल्या पंधरवड्यापासून सतत सुरू असलेल्या पावसाने सांबरा शिवारातील रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे
शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मुसळधार पावसाच्या पाण्याच्या लोंढ्यामुळे सांबरा विमानतळ भिंतीलगताचा रस्ता वाहून गेला आहे. परिणामी शेतकऱ्यांना विमानतळाच्या शिवारात ये-जा करणे कठीण बनले आहे.
आठवड्यापासून सांबरा भागात जोरदार पाऊस होत असल्याने नाल्याचे पाणी पात्राबाहेर वाहत होते.जोरदार प्रवाहामुळे विमानतळ संरक्षक भिंतीजवळचा रस्ता वाहून गेला आहे. सुमारे अर्धा कि. मी. चा रस्ताच गायब झाला आहे. वाहने सोडा साधे चालत जाणेही मुश्किल झाले आहे.
तीन वर्षांपूर्वी रस्त्यासाठी 72 लाखाचा निधी खर्च करण्यात आला होता. तर 4 महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीने मेटलींगसाठी पुन्हा 18 लाख खर्च केले होते.या रस्त्याचे काम देखील सुमार दर्जाचे झाले आहे त्यामुळे देखील हा रस्ता वाहून गेला आहे यामुळे भागातील शिवारात जाण्यासाठी मुतगा, शिंदोळी, बसरीकट्टी असा 10 किमी चा फेरा मारावा लागत आहे.
बेळगाव विमान तळाचा वापर करून ये जा करणारे नेत्यांनी सांबरा भागातील या रस्त्याची पहाणी करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. आमदार असोत किंवा खासदार जिल्हा पंचायत सदस्य असोत किंवा कुणीही लोकप्रतिनिधीने याकडे फिरकून बघितले नाही. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांचा कळवळा आहे की नाही हाच प्रश्न उपस्थित झाला आहे. त्वरित प्रशासनाने व लोकप्रतिनिधीनी याकडे लक्ष द्यावे अन्यथा आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.विमान तळ विकासासाठी शेतकऱ्यांची जमीन हवी मात्र शेतकऱ्यांच्या समस्या सोडवायला नको अशी अवस्था या बेळगावच्या लोक प्रतिनिधींची झाली आहे असा देखील आरोप होत आहे.