अतिवृष्टीमुळे बेळगाव जिल्ह्याच्या विविध भागात पूर आला आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी केली असून राष्ट्रीय डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आणि स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स ला पाचारण करण्यात आले आहे.
पूरग्रस्त भागातील कुटुंबांना स्थलांतरित करण्याचे काम एसडीआरएफ करीत असून एन डी आर एफ टीम अजून आलेली नाही. पुराचा धोका होत असलेल्या गावांना इतरत्र हलवण्याचे काम वार फुटेज वर सुरू आहे.
चिकोडी तालुक्यातील मांजरी गावाच्या हरित नगर मधील 100 जणांना बोटीच्या साहाय्याने सुरक्षितस्थळी नेण्यात आले. कृष्णा नदीच्या पात्र वाढल्याने ते अडकले होते.
मालवाड, यडुर, यडुरवाडी, कल्लोळ येथेही मदत करण्यात आली आहे. अथणी तालुक्यातील सप्तसागर गावातील 40 कुटुंबातील 150 सदस्य, नदी इंगळगाव येथील18, शिरहट्टी येथील 25 आणि नागनूर पिके मधील25 लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे.
कारवार जिल्ह्यातून वाढीव बोटी मागवण्यात आल्या आहेत. सर्व तालुका पातळीवर 24 तास हेल्पलाईन सुरू करण्यात आल्या आहेत.चिकोडी, अथणी आणि रायबाग तालुक्यातील 16 पूल पाण्याखाली गेले आहेत. खानापूर, गोकाक आणि कागवाड तालुक्यातील 9 पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे कोणीही नागरिक या ब्रिजवर जाऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
एकजण गेला वाहून
बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील अंकलगी गावाचा युवक पुराच्या पाण्यात वाहून गेला असल्याची माहिती हाती आली आहे.
गावातील जोराने वाहणारे नाल्याचे पाणी वाढल्याने ही घटना घडली. शिवानंद शंकर नाईक (25) असे त्याचे नाव आहे.
ग्रामस्थांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असून अंकलगी पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. रात्री उशिरापर्यंत शिवानंद सापडलेला नाही.