अलीकडच्या काही वर्षात तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. जंगल संपवून काँक्रिटीकरणाच्या विळखा वाढला आहे. त्यामुळे उन्हाळा कडक वाटू लागला आहे. अशा वेळी सर्वच लोकांना पूर्वीची घरे आठवू लागली आहेत. मातीच्या कौलारू घरांची आठवण आजही मनात घर करून आहे. त्यामुळे भविष्यात नैसर्गिक गारवा देणारी घरे बांधण्याकडे अनेकांचा कल वाढत आहे.
आधुनिकतेच्या काळात खासगी कार्यालया बरोबरच सरकारी कार्यालये काच बंद एसी फॅन यामध्ये गुरफटलेली आहेत. पंख्याचा अतिवापर वैज्ञानिक दृष्ट्या शरीराला हानिकारक असल्याची माहिती पुढे आली आहे. वाढत्या तापमानामुळे घरात व ऑफिसमध्ये पंखे ,एसी ,कुलर या कृत्रिम साधनांचा वापर करून गारवा शोधण्याचा प्रयत्न सुरू असतो. मात्र मातीच्या कौलारू घरांची आठवण साऱ्यांनाच येऊन जाते.
पंचवीस ते तीस वर्षांपूर्वीच्या मातीच्या कौलारू घरांची जागा आता मोठ्या इमारतीने घेतली आहे. पर्यावरण अबाधित राखण्यासाठी झाडे लावणे महत्त्वाचे आहे. मात्र झाडांची संख्या कमी झाल्यामुळे आता सतत कृत्रिम साधनांचा वापर डोईजड होऊ लागला आहे. विशेष करून पावसाळ्यातही या साधनांचा वापर होऊ लागला आहे. त्यामुळे लहान मुलांवर याचा परिणाम होतो.
वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर काँक्रिटीकरणाची घरे दाटीवाटीने बांधली जात आहेत. मात्र याचा तोटा सहन करावा लागत आहे. पर्यावरण अबाधीत राखण्यासाठी प्रशासन दरवर्षी लाखो झाडे लावते. मात्र त्यातील किती जगली याची काळजी प्रशासनाला नसते. झाडे लावणे फोटोसेशन करणे यापुरतीच पर्यावरण अबाधित राखण्याची मर्यादा उरली आहे का? हा प्रश्न देखील गंभीर बनला आहे.
आणखी काही दिवस असेच गेल्यास गारवा शोधण्यासाठी आता ग्रामीण भागाकडे जावे लागणार आहे. मात्र ग्रामीण भागातील झाडांची संख्या कमी होत असल्याने तेथेही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कौलारू घरांच्या गारव्याची आठवण कायम राखण्यासाठी आता अनेकजण जुन्या पद्धतीने घरे बांधण्याकडे वळू लागले आहेत. पूर्वी जुन्या घरांना मोठ्या खिडक्या दारांमुळे सर्वत्र स्वच्छ सूर्यप्रकाश आणि खेळती हवा असल्याने वातावरण आल्हाददायक असायचे. आता मात्र एसी, कुलर सारख्या विळख्यात घरे आणि शासकीय कार्यालय अडकल्याने गारवा शोधण्यासाठी जुन्या घरांच्या आठवणीही मनात घर करून राहात आहेत. नवीन बांधकामे करताना यापुढे ट्रेडिशनल वर भर असेल यात शंका नाही.