Saturday, April 27, 2024

/

सत्ता संघर्ष भाग २ 

 belgaum

पहिला लेख प्रसिद्ध केल्यावर अनेकांनी कौतुकाची थाप दिली आणि भेटल्यावर आवर्जून वाचल्याचे सांगितले त्या बद्धल सर्व प्रथम तमाम वाचकांचे आभार. मागच्या लेखात जिल्ह्याचे राजकारण कसे काम करते यावर लिखाण झाल होत त्यामुळे आता जवाबदारीचे भान बाळगून विभागवार लिहिण्याचा प्रयत्न करतोय हे अंदाज सर्वस्वी माझे आहेत.तुमचे वेगळे असू शकतात कारण राजकारणात प्रत्येकजण वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहत असतो आणि अभ्यास करत असतो आणि त्यानुसार त्यांचे मत बनत असते. बेळगाव जिल्ह्यातील १८ मतदारसंघावर मी काही भाष्य करणार नाही कारण सध्या प्रामुख्याने माझ्यासमोर फक्त सहा मतदार संघ आहेत जिथे मराठी भाषेच्या व भाषिकांच्या अस्तित्वाची लढाई आहे. माझा पिंड मराठीचा असल्याने त्या माय मराठीच्या हितासाठी कायम हि लेखणी चालावी यासाठी हे धाडस करतोय.
बेळगाव जिल्ह्यातील १ नंबरचा मतदारसंघ आणि या सीमाभागातील मराठी माणसाच्या लढाईत कायम अग्रेसर असलेले बेळगाव जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणजे निपाणी मतदारसंघ. १९८५ पर्यंत या मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीची निर्विवाद सत्ता होती पण नंतरच्या काळात ज्यांच्या हातात समिती होती त्यांनी ती राष्ट्रीय पक्ष्यांचा दावणीला बांधल्याने मराठी माणूस राहिला पण समितीचे अस्तित्व कमी कमी होऊ लागले . आजच्या घडीला या मतदारसंघातील मातब्बर नेते हे एकेकाळी समितीचे कार्यकर्ते होते हे जुने जाणते लोक आजही सांगतात आणि त्यामुळेच बहुतेक या भागातील राजकारण हे बहुपक्षीय जरी झाले तरी ते सिमालढयाशी बांधिलकी जपणारे आहे हे प्रकर्षाने जाणवते. निपाणी मतदार संघावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नंतरच्या काळातील दुर्लक्ष हे तिथल्या सध्याच्या परिस्थितीला जवाबदार आहे असे वाटते . कारण आजही जेव्हा निवडणुकांचा प्रश्न येतो तेव्हा मध्यवर्तीचे धोरण जितके बेळगाव व खानापूर भागातील प्रखर आणि संघर्षपुर्ण असते तितके ते निपाणीच्या बाबतीत दिसून येत नाही. निपाणी मतदार संघाबाबत जितकी घटक समिती जवाबदार तितकीच मध्यवर्ती सुद्धा कारण घटक समिती जर दुबळी होत असेल तर ती भक्कम करण्याची जवाबदारी मध्यावार्तीची ठरते कारण शेवटी या सगळ्या गोष्टी लढ्याला धरून असतात , त्यामुळे मध्यवर्तीने कोणत्याही भागाकडे दुर्लक्ष करणे तसे तत्वतः चुकीचेच. गेल्या अनेक वर्षात या भागातील सत्तेच्या चाव्या या कॉंग्रेसकडे होत्या पण सुभाष जोशींच्या ऐनवेळच्या राजकारणामुळे पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकला आणि शशिकला जोल्लेबाई निवडून आल्या . आता या लाटेवर स्वार झाल्या हे काही नव्याने सांगायला नको. सध्याच्या निवडणुकीत कॉंग्रेस भाजप सरळ लढत मानली जात असली तरी पुन्हा एकदा सुभाष जोशींची भूमिका काय असणार हे पाहणे औस्तुक्याचे असणार. यात नुकताच तरुणभारत चे प्रमुख किरण ठाकूर यांचा भव्य दै तरुण भारत शताब्दीच्या उंबरठ्यावर कार्यक्रम निपाणीत पार पडला. त्यामुळे त्यांची या भागातील भूमिका काय असणार हे देखील महत्वाचे ठरणार आहे कारण शेवटी माध्यम असणे हि खूप मोठी ताकद असते हे राजकारण समजणाऱ्या माणसाला नक्कीच कळत. महाराष्ट्र एकीकरण समितीचे एक मोठे नेते असल्याने या ठिकाणी ते काय भूमिका घेतात हे या मतदारसंघाचे भविष्य ठरवणार हे नक्की. कारण सीमालढ्यात या मतदारसंघाची भूमिका तितकीच महत्वाची जितकी सीमाभागातील मतदारसंघांची आहे. जयराम मिरजकर यांच्या एकाकी नेतृत्वामुळे त्या ठिकाणी समितीचा उमेदवार कोण होऊ शकतो हे संभ्रमाचे आहे . अच्युत माने याचं जरी नाव समोर येत असल तरी ते विजयश्री खेचेतील का हे पाहावे लागेल कारण काकासाहेब पाटील आणि जोल्ले यांचा या मतदारसंघातील जम पाहता समितीसाठी हा मतदारसंघ कठीण जाणार हे नक्की . पण जर जुनी नाती जोडली गेली तर कदाचित शरद पवार साहेबांचे राजकारण इथे टर्निंग ठरू शकते. पण हे कसे जुळेल या बद्धल सांगणे कठीण. पवार साहेब या मतदार संघात चमत्कार घडवू शकतात जर ती जुनी नाती जोडली तर आणि त्यात भर किरण ठाकूर यांच्या कल्पकतेची असू शकते हे नक्की.या सगळ्या जर तर च्या गोष्टी आहेत. यात जयराम मिरजकर यांना कमालीची धडपड करावी लागणार जर त्यांना इथे समितीचे अस्तित्व राखायचे असेल तर. पण हि जवाबदारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण घेवून ,तिथल्या भागाला बळकटी देते का हे पाहावे लागेल. मतदारसंघांची तोडफोड आणि मध्यवर्ती बेळगाव भागात केंद्रित होणे यामुळे आधीच समितीने कारवार भागातील मतदारसंघ कायमसाठी गमावले आहेत पण निपाणीचा गड अजूनही या शेवटच्या पर्वासाठी सज्ज होतो शकतो हे येणारा काळ ठरवेल.

लेेेेखन -पियुष हावळ
बेळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.