बेळगाव लाईव्ह : मध्यवर्ती शिवजयंती महामंडळाच्या अध्यक्ष निवडीवरून खजिनदारांना फटकारले जात असून, त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी सत्र सुरूच आहे.
मध्यवर्ती शिवजयंती महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर नाराजी व्यक्त करत मराठा समाजाचे आराध्य दैवत जती मठाचे अध्यक्ष दत्ता जाधव, नार्वेकर गल्ली बाल गणेश मंडळाचे अध्यक्ष व युवा कार्यकर्ते सागर पाटील, तसेच कोनवाळ गल्ली परिसरातील युवा कार्यकर्ते बळवंत शिंदोळकर यांनी पत्रकाद्वारे नाराजी व्यक्त केली आहे.
मध्यवर्ती शिवजयंती महामंडळाचे अध्यक्ष दीपक दळवी हयात असताना, मागील वर्षीच्या बैठकीत हंगामी अध्यक्ष नियुक्त करण्याबाबत चर्चा झाली होती. हा निर्णय जवळपास निश्चित झाला होता; मात्र काही विघ्नसंतोषींनी आडकाठी आणल्याने तो पुढील वर्षी घेण्याचे ठरवण्यात आले होते.
मात्र, ५ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत जुना निर्णय बाजूला सारून खजिनदारांनी मनमानी कारभार केल्याचा आरोप कार्यकारिणीतील सदस्यांनी केला आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, लोकशाही पद्धतीने प्रक्रिया न राबवता खिशातून चिठ्ठी काढून आपल्या मर्जीतील अध्यक्षाचे नाव जाहीर करण्यात आले.
यावेळी कोणत्याही कार्यकर्त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच, बैठक बोलावण्याचा अधिकार नसतानाही खजिनदारांनी बैठक बोलावून ही प्रक्रिया बेकायदेशीर पद्धतीने राबवली, असेही सांगण्यात आले आहे.

खिशातून चिठ्ठी काढून उमेदवार जाहीर करण्याची पद्धत कायम ठेवण्यात आली असून, मागील अनेक निवडणुकांमध्येही मनमानी कारभार करून उमेदवार जाहीर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पद्धतीला आमचा विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या ढिसाळ कारभाराला कंटाळून आम्ही शिवजयंती महामंडळावर बहिष्कार घालत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. तसेच, संपूर्ण प्रक्रिया पुन्हा राबवून लोकशाही पद्धतीने अध्यक्षांची निवड करण्यात यावी, अशी मागणी सागर पाटील, दत्ता जाधव, बळवंत शिंदोळकर यांनी केली आहे.





