बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्य सहकारी पतसंस्था महामंडळ आणि मुंबईच्या पॉलिसी ग्रेस इन्शुरन्स ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव विभागातील पतसंस्थांच्या संचालकांसाठी एकदिवसीय शैक्षणिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महांतेश नगर येथील महांत भवनमध्ये पार पडलेल्या या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महामंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर आर. होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन बिडीसीसी बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्याहस्ते पार पडले. उदघाटनपर भाषणात बोलताना अण्णासाहेब जोल्ले म्हणाले, स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी विम्याचे महत्त्व समजून घेणे ही काळाची गरज आहे, भारतामध्ये आयुर्विम्याबाबत पुरेशी जागरूकता नसून, कुटुंबातील वारसदारांच्या हितासाठी आणि कठीण काळात आर्थिक आधार मिळवण्यासाठी प्रत्येकाने विमा उतरवला पाहिजे. भारत आणि परदेशातील विमा क्षेत्रातील तफावतीवर प्रकाश टाकताना ते म्हणाले की, “कठीण काळात कुटुंबातील वारसदारांना आर्थिक आधार मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने विमा उतरवणे आवश्यक आहे.”
याप्रसंगी हरदीप साल्वान यांनी ‘पतसंस्थांचे सुरक्षित भविष्य आणि विमा योजना’ या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी त्यांनी पतसंस्थांच्या आर्थिक स्थैर्यासाठी विम्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, “पतसंस्थांनी केवळ कर्ज वाटपावर लक्ष केंद्रित न करता, त्या कर्जाला विम्याचे कवच देणे आवश्यक आहे.
कर्जदार सभासदाचा अनपेक्षित मृत्यू झाल्यास विम्याच्या रकमेतून कर्जाची परतफेड होते, ज्यामुळे संस्थेचा एनपीए नियंत्रित राहतो आणि मृताच्या कुटुंबावर कर्जाचा बोजा पडत नाही. अशा विमा योजनांमुळे ठेवीदारांचा संस्थेवरील विश्वास वाढून पतसंस्थेचे भविष्य अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होते.” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला धरेप्पा अलगूर, डॉ. संजय होसमठ, तम्मण्णा केंचरड्डी, उमेश बाळी, बसगौडा पाटील, शाहीन अब्बास, जितेंद्र सिंग, संतोष कुमार, सी. एम. मारेगौडा, डॉ. बी. डी. भूकांत, डॉ. नागेंद्र डी. एल., रवी कलबुर्गी यांच्यासह बेळगाव, धारवाड, कारवार, गदग आणि हावेरी जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





