गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणीत राज्य देशासाठी आदर्श : जारकिहोळी

0
6
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्य सरकार हे गरीबांच्या हितासाठी कटिबद्ध असून, मागील 70 वर्षांत भूसंपादन, शिक्षण, वाहतूक व्यवस्था यांसह अनेक जनकल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. विद्यमान सरकारने पाच गॅरंटी योजना प्रभावीपणे लागू करून देशासाठी आदर्श निर्माण केला आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी स्पष्ट केले.

बेळगावातील कुमार गंधर्व रंगमंदिर येथे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आयोजित पंचगॅरंटी अंमलबजावणी विषयक जिल्हा गॅरंटी कार्यशाळा आणि प्रगती परीक्षण सभेचे उद्घाटन करताना ते बोलत होते.

पंचगॅरंटी योजना लागू करण्यापूर्वी अनेक टीका झाली असली तरी, राज्य सरकारने या योजना प्रभावीपणे अंमलात आणून गरीबांना आर्थिक स्वावलंबन देण्याबरोबरच समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी गरीबांच्या कल्याणासाठी अनेक कार्यक्रम राबवले जात असून, पंचगॅरंटी योजना राज्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचतील, याची सरकार काळजी घेत आहे.

 belgaum

येत्या काळात गॅरंटी योजनांशी संबंधित तांत्रिक त्रुटी दूर करण्यात येणार असून, या योजनांसह सिंचन, रस्ते, शिक्षण अशा विकासकामांनाही गती देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रत्येक लाभार्थ्याला अंदाजे पाच हजार रुपये मिळत असून, हा निधी योग्य हेतूसाठी वापरावा, असे आवाहनही त्यांनी केले. पुढील पाच वर्षांसाठी अंदाजे तीन लाख कोटी रुपये राखीव ठेवण्यात येणार आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

राज्य गॅरंटी योजना प्राधिकरणाचे अध्यक्ष एच. एम. रेवण्णा म्हणाले की, पंचगॅरंटी योजनांच्या अंमलबजावणीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल दिसून येत आहेत. डी. देवराज अरसुंच्या उळुववने ओडेय, एस. बंगारप्पांची आश्रय योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज, वीरप्प मोइली यांची सीईटी प्रणाली, तसेच एस. एम. कृष्ण यांची आर्थिक धोरणे — या सर्वांपेक्षा अधिक लोककल्याणकारी योजना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राबवल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य गॅरंटी योजना प्राधिकरणाचे उपाध्यक्ष एस. आर. पाटील म्हणाले, 2023 च्या निवडणुकीपूर्वी पंचगॅरंटी राबवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. सत्तेवर आल्यानंतर सरकारने शक्ती योजना त्वरित सुरू केली आणि सर्व गॅरंटी योजना टप्प्याटप्प्याने अंमलात आणून आश्वासनाची पूर्तता केली.


पंचगॅरंटी योजनांमुळे लाखो नागरिकांनी स्वयंरोजगार सुरू करून आर्थिक स्वावलंबन मिळवले असून, राज्याच्या प्रति व्यक्ती उत्पन्नात झालेली वाढ ही या योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीचे फलित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमात विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, आमदार राजू (आसिफ) सेठ, तसेच विविध प्राधिकरणांचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

संसाधन व्यक्ती मुथुराज यांनी सांगितले की, टीका असूनही गॅरंटी योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीतून सरकारने सर्व प्रश्नांना प्रत्यक्ष उत्तर दिले आहे. शक्ती योजना अंतर्गत 600 कोटींपेक्षा जास्त प्रवासी महिलांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला असून, गृहलक्ष्मी योजनेमुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.


पंचगॅरंटीमुळे प्रत्येक कुटुंबाला दरमहा 4 ते 5 हजार रुपयांची बचत होत असून, रोजगारसंधी वाढून राज्य विकासाच्या दिशेने पुढे जात आहे. राज्यातील दीड कोटींहून अधिक नागरिक या योजनांचा लाभ घेत आहेत.कार्यक्रमात आमदार गणेश हुक्केरी, प्राधिकरणाचे जिलाध्यक्ष विनय नावलगत्ती, बुडाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, काडाचे अध्यक्ष युवराज कदम, तसेच अनेक अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा पंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी बसवराज हेगनायक यांनी स्वागत केले. कार्यक्रमात लाभार्थ्यांच्या माहितीची यशोगाथा पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आणि काही लाभार्थ्यांनी आपले अनुभवही मांडले.कार्यक्रमापूर्वी क्रांतीवीर संगोळी रायन्ना चौकातून कुमार गंधर्व रंगमंदिरापर्यंत पूर्णकुंभ मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.