belgaum

बाळाण्णा: व्यक्ती नव्हे, प्रेरणादायी संस्था

0
49
 belgaum

(मे. बी टी पाटील उद्योग समूहाचे शिल्पकार असलेल्या बाळासाहेब भरमगौडा पाटील यांना वयाच्या 93 व्या वर्षी 30 ऑक्टोबर रोजी देवाज्ञा झाली. आज त्यांचा बारावा दिवस. त्यांच्या समवेत गेल्या 32 वर्षापासून कार्यरत असलेल्या त्यांच्या एका कर्मचाऱ्यांने त्यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना…..)

३० ऑक्टोबर २०२५ हा दिवस आमच्यासाठी अत्यंत वेदनादायी ठरला.
त्या दिवशी आम्ही गमावला एक द्रष्टा उद्योजक, एक दयाळू मार्गदर्शक, आणि एक कर्तृत्ववान माणूस श्री. बाळासाहेब पाटील.
आमच्या उद्योग समूहात असलेल्या शेकडो कर्मचाऱ्यांसाठी ते केवळ एक बॉस नव्हते, तर ते होते मार्गदर्शक, मित्र, वडीलधारी व्यक्तिमत्त्व आणि प्रत्येकाच्या संकटात भक्कमपणे पाठीशी राहणारा आधारस्तंभ.
बाळासाहेब म्हणून बाहेर ओळखले जाणारे अण्णा आम्हाला मात्र  बाळाण्णा होते. ते  नेहमीच शांत असायचे आणि चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य असे. कोणताही कठीण प्रसंग आला तरी त्यांनी चेहऱ्यावर कधीच  तणाव दाखवला नाही. ते म्हणायचे

> “योग्य प्रयत्न आणि प्रामाणिक परिश्रम केल्यास काहीही अशक्य नाही. ‘अशक्य’ हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.”

 belgaum

त्यांचे  शिक्षण भारतात आणि अमेरिकेत झालेले असले तरीही ज्ञानाची आणि शिकण्याची त्यांची ओढ अखंड होती. नवे तंत्रज्ञान असो वा विचार, ते नेहमीच उत्साहाने समजून घेण्याचा प्रयत्न करायचे.
बाळाण्णांसाठी कामगार आणि पुरवठादार हे केवळ व्यावसायिक घटक नव्हते तर ते त्यांच्याच कुटुंबाचा एक भाग होते.
ते नेहमी म्हणायचे

> “जे साहित्य पुरवतात, त्यांच्यामुळेच आपण काम पूर्ण करू शकतो. त्यांच्या श्रमाचा आदर करा.”

पुरवठादारांचे बिल प्रलंबित राहिले तर ते रागावत, कारण त्यांच्यासाठी तो केवळ पैशाचा नव्हे तर प्रामाणिकतेचा आणि आदराचा प्रश्न होता.
ते आदर, सहानुभूती आणि करुणेचं जिवंत प्रतीक होते.
कोणतीही अडचण आली तरी ते कधीही हार मानणारे नव्हते, ते खरे लढवय्ये होते.
त्यांचा उदारपणा आणि दयाळूपणा त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसून येत असे.
कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याबद्दल ते नेहमीच काळजी घेत.
समाजाला परत देणं ही त्यांच्यासाठी केवळ जबाबदारी नव्हती,ती त्यांची जीवनशैली होती.
लातूर भूकंप, गुजरात भूकंप, बेळगावातील पूरस्थिती आणि कोरोनाचा काळ,प्रत्येक वेळी ते मदतीसाठी प्रथम पुढे आले.
देशव्यापी लॉकडाऊननंतर केवळ आठ दिवसांत त्यांनी कर्नाटकातून सर्वप्रथम एक कोटी रुपयांची देणगी दिली. ते कारगिल युद्धप्रसंगीही दातृत्वाने उभे राहिले.

गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी ठळकवाडी हायस्कूल, टिळकवाडी, बेळगाव येथील १२५ गरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करून शिक्षणाला हातभार लावला. शिक्षण, आरोग्य, क्रीडा, सामाजिक कार्य आणि दारिद्र्य निर्मूलन  या सर्व क्षेत्रांत त्यांचं योगदान अमूल्य होतं.
ते आपल्या भावंडांच्या व बहिणींच्या कुटुंबीयांशीही तितक्याच आत्मीयतेने वागत.त्यांच्यासाठी ते मार्गदर्शक, सल्लागार आणि आधारस्तंभ होते.
त्यांचं संपूर्ण आयुष्य कुटुंब आणि समाजासाठी वाहिलेलं होतं.
श्री. बाळाण्णांना खेळ आणि संगीत यांची विलक्षण आवड होती.
ते सचिन तेंडुलकरच्या फलंदाजीचा उत्साहाने आनंद घेत,टेनिस सामनेही आवडीने पाहायचे.आलिशान कार गाड्यांचा त्यांना छंद होता,
ते शास्त्रीय संगीताचे रसिक होते.पं. भीमसेन जोशी, गंगुबाई हनगल, सुधीर फडके, महेश काळे आणि राहुल देशपांडे यांच्या जुगलबंदीचा ते आस्वाद घेत.
शिस्त आणि समयपालन ही त्यांची ओळख होती.
मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला त्यांच्यासोबत कार्यालयीन कामासाठी विविध ठिकाणी प्रवास करण्याची संधी मिळाली.प्रवास असो वा बैठक, ते नेहमी वेळेआधी तयार असायचे.
ते म्हणायचे
> “वेळेचं पालन म्हणजे इतरांचा सन्मान.”

कोणालाही वाट पाहायला लावणं त्यांना सहन होत नसे. त्यांना साधं आणि सात्विक अन्न प्रिय होतं. पुण्यात मुक्काम असताना ते दिगंबर जैन बोर्डिंगमधील अन्नाचा आस्वाद घ्यायचे.
सलग २५ वर्षे ते महावीर सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले.
बैठकींसाठी मिळणाऱ्या मानधनाची रक्कम ते दरवर्षी एकत्र करून, त्यात स्वतःकडून थोडी भर घालून भरतेश शाळेतील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दान देत.
कर्मचाऱ्यांच्या प्रगतीबाबतही ते सदैव जागरूक होते. निष्ठावान, मेहनती आणि समर्पित कर्मचाऱ्यांना ते दरवर्षी आर्थिक प्रोत्साहन देत.
चूक झाली तरी ओरडत नसत. फक्त म्हणायचे,

> “चूक झाली म्हणजे तू काम करतो आहेस; पण ती पुन्हा होऊ देऊ नकोस.”
साधी राहणी, उच्च विचार सरणी ही त्यांची जीवनशैली होती
ते नेहमी पांढरा शर्ट आणि पांढरी पॅन्ट घालीत.
त्यांचं जीवन हे ‘साधेपणात मोठेपणा आणि कर्मात मानवता’ या विचाराचं मूर्तिमंत उदाहरण होतं.

ते नियमित राष्ट्रीय, आर्थिक आणि क्रीडा बातम्या वाचत, टीव्हीवर पाहत. शेअर बाजार, चलन बाजार आणि सोन्याच्या दरातील चढ-उतारांमागचं कारण शोधणं ही त्यांची सवयच होती.
आज त्यांचं शारीरिक अस्तित्व नाही, पण त्यांचे विचार, मूल्यं आणि कृती यांचा प्रकाश किरण आमच्या प्रत्येकामध्ये कायम जिवंत राहील.

“माणूस जातो, पण त्याची कर्मं आणि स्मृती कधीच मरत नाहीत.”

मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला या दूरदृष्टी असलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या मार्गदर्शनाखाली ३२ वर्षे काम करण्याची संधी मिळाली.
अशा त्या महापुरुषाला श्री. बाळाण्णांना, माझे विनम्र अभिवादन.

– ओमप्रकाश प्रभू,

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.