बेळगाव लाईव्ह :”वृत्तपत्रे माध्यमे म्हणजे सर्वसामान्यांचा आवाज होय. भाषा टिकविण्याचे आणि वाढविण्याचे कार्य करण्यामध्ये वृत्तपत्रांचे माध्यमांचे योगदान मोठे आहे”असा सूर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या चर्चासत्रात उमटला.
येथील सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित अभिजात मराठी भाषा गौरव दिन आणि अभिजात मराठी भाषा गौरव सप्ताहाचा प्रारंभ शुक्रवारी सायंकाळी सार्वजनिक वाचनालयात झालेल्या कार्यक्रमाने झाला.
सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड व सहकारी यांनी दीप प्रज्वलन करून सप्ताहाचे उद्घाटन केले. अनंत लाड यांनी प्रास्ताविक करून उपस्थित पत्रकार व रसिकांचे स्वागत केले.
सप्ताहाचे उद्घाटन मराठी भाषेच्या अभिवृद्धीत पत्रकारांचे योगदान या विषयावर झालेल्या चर्चासत्राने करण्यात आले. या चर्चासत्रात दैनिक तरुण भारतचे सुशांत कुरंगी, दैनिक पुढारीचे शिवाजी शिंदे, दैनिक सकाळचे मलीकार्जुन मुगळी, दैनिक रणझुंजारचे संपादक मनोहर कालकुंद्रीकर, बेधडक बेळगावचे पियुष हावळ आणि विलास बेळगावकर यांनी भाग घेतला.
“वृत्तपत्रांनी जीवनाशी निगडित असे विषय मांडले असल्याने आणि समस्यांची मांडणी वृत्तपत्रात होत असल्याने सामान्यांचा आवाज म्हणजे पत्रकार” असे मत शिवाजी शिंदे यांनी व्यक्त केले.
” मराठी भाषेतील साहित्यिकांचा आणि बोलीभाषांचा परिचय करून देण्याची सदरे सकाळने चालविण्याची माहिती मुगळी यांनी दिली.
“मराठी भाषा टिकविण्याचे काम स्वर्गीय बाबुराव ठाकूर यांनी सुरू केले ते किरण ठाकूर आणि आता प्रसाद ठाकूर हे तरुण भारत तून अव्याहतपणे करीत आहेत” असे मत कुरंगी यांनी मांडले .
दैनिक रणझुंजार ने खेड्यापाड्यात ग्रंथालय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिल्याची माहिती मनोहर कालकुंद्रीकर यांनी दिली.
“मराठी भाषेला मोठी परंपरा आहे, संतांनी वाढविलेली ही भाषा जगभर पसरली आहे. तिच्या जोपासण्याचे काम वृत्तपत्रे व आत्ता सोशल मीडिया करीत आहेत”असे मत पियुश हावळ यांनी व्यक्त केले.
“सीमा लढा टिकवण्याचे काम वृत्तपत्रांनीच केले आहे” असे मत विलास बेळगावकर यांनी व्यक्त केले.
चर्चासत्राचा समारोप बसवंत शहापूरकर यांनी कविता वाचनाने केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाच्या कार्यवाह सुनिता मोहिते यांनी केले तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष डॉ .विनोद गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमास वाचनालयाचे संचालक आय जी मुचंडी अभय याळगी, रघुनाथ बांडगी, लता पाटील व प्रसन्न हेरेकर यांच्यासह निमंत्रित व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
शनिवारचा कार्यक्रम :
गौरव सप्ताह निमित्त शनिवारी सायंकाळी पाच वाजता आरपीडी महाविद्यालयाचे प्रा. महादेव खोत यांचे मराठी भाषा व संस्कृती या विषयावर व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानास रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वाचनालया तर्फे करण्यात आले आहे



