Friday, December 5, 2025

/

जारकीहोळींची पकड ‘DCC’ वरील वर्चस्वातून पुन्हा सिद्ध

 belgaum

बेळगाव लाईव्ह:  बेळगावच्या राजकारणातील ‘किंगमेकर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जारकीहोळी बंधूंचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत भालचंद्र जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने मोठे यश मिळवले आहे. एकूण १६ जागांपैकी ९ जणांची बिनविरोध निवड झाली असून, त्यापैकी ७ उमेदवार थेट भालचंद्र जारकीहोळी यांच्या गटाचे आहेत. ही बिनविरोध निवड म्हणजे बेळगावच्या राजकारणातील जारकीहोळी कुटुंबाची मजबूत पकड आणि त्यांचे प्रशासनावरील नियंत्रण दर्शवते. उर्वरित ७ जागांसाठी आता निवडणूक होणार असून, यातही आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी जारकीहोळी गट प्रयत्नशील आहे.

यापूर्वीच चिकोडी तालुक्यातून गणेश हुक्केरी, गोकाकमधून अमरनाथ जारकीहोळी, सवदत्तीतून विरुपाक्ष मामणी आणि यरगट्टीमधून विश्वास वैद्य यांची बिनविरोध निवड निश्चित झाली होती. याव्यतिरिक्त, आज इतर एका मतदारसंघात चन्नराज हट्टीहोळी यांच्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे चन्नराज हेही बिनविरोध निवडून आले आहेत. त्याचप्रमाणे, कागवाडमधून राजू कागे, खानापूरमधून अरविंद पाटील, बेळगावमधून राहुल जारकीहोळी आणि मुदळगीमधून नीलकंठ कप्पलगुड्डी यांच्या विरोधात अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने या चौघांचीही बिनविरोध निवड निश्चित झाली. बिनविरोध निवडून आलेल्या एकूण ९ उमेदवारांपैकी ७ उमेदवार भालचंद्र जारकीहोळींच्या पॅनेलचे आहेत, तर दोघे अपक्ष (स्वतंत्र) उमेदवार आहेत. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांनी त्यांचे प्रमाणपत्र स्वीकारले. डीसीसी बँकेसमोर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष केला. आज एकूण २० उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. यामुळे ७ तालुक्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या रिंगणात आता एकूण १४ स्पर्धक उरले आहेत.

या ७ तालुक्यांमध्ये म्हणजेच हुक्केरी (रमेश कत्ती-राजेंद्र पाटील), अथणी (लक्ष्मण सवदी-महेश कुमठळ्ळी), निपाणी (अण्णासाहेब जोल्ले-उत्तम पाटील), बैलहोंगल (महांतेश दोड्डगौडर-डॉ. विश्वनाथ पाटील), कित्तूर (नानासाहेब पाटील-विक्रम इनामदार), रामदुर्ग (मल्अण्णा यादवाड-एस.एस. ढवण) आणि रायबाग (अप्पासाहेब कुलुगुडे-बसनगौडा आसंगी) येथे निवडणूक होणार आहे. विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांची डीसीसी बँक संचालकपदी बिनविरोध निवड झाल्यामुळे त्यांच्या निवासस्थानी मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि आई गिरिजा हट्टीहोळी यांचे आशीर्वाद घेतले.

 belgaum

आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी विजयानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, “आमच्या पॅनेलमधून चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह एकूण ७ जण बिनविरोध निवडून आले आहेत. गणेश हुक्केरी अपक्ष आणि जिल्हा पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार राजू कागे निवडून आले आहेत. उर्वरित ७ तालुक्यांसाठी १९ ऑक्टोबर रोजी निवडणूक होईल, परंतु १८ ऑक्टोबरपर्यंत समझोत्याची प्रक्रिया सुरू राहील.”  अहिंदा  समुदायाच्या जागेबद्दल बोलताना ते म्हणाले की, “लोकर उद्योगाची जागा रद्द झाल्यामुळे, हाळुमठ समाजाला याच प्रशासकीय मंडळात शंभर टक्के जागा देणार.” त्यांनी चार महिन्यांच्या प्रयत्नांमुळे ७ जागा बिनविरोध आल्याचे सांगितले. तसेच, “हार-जीत अटळ असून, बँक कारभार चांगला चालवू. जो अध्यक्ष होईल, त्याच्या हातात बँकेचा लगाम असेल,” असे मत त्यांनी व्यक्त केले. “डीसीसी बँकेचा कारभार व्यवस्थित चालावा यासाठी आम्ही मार्गदर्शन करू,” असे स्पष्ट केले. जारकीहोळी बंधूंनी एकत्र येऊन अण्णासाहेब जोल्ले यांना हरवणार या चर्चेला उत्तर देताना ते म्हणाले, “आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत आणि अण्णासाहेब जोल्ले शंभर टक्के जिंकतील.” कित्तूर आणि हुक्केरीमध्ये अजून लढत असल्याचे त्यांनी नमूद केले.

आपली बिनविरोध निवड होताच आमदार गणेश हुक्केरी वडील विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्यासह आले आणि त्यांनी आपले प्रमाणपत्र स्वीकारले. यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “आमचे  कोणाचाही पॅनेल नाही. कोणाच्याही मागे न लागता गणेश स्वतंत्रपणे निवडून आले आहेत,”. बिनविरोध निवडून आल्यानंतर राजू कागे म्हणाले, “मी सहकार क्षेत्रात पहिल्यांदाच उमेदवारी अर्ज दाखल केला होता. कागवाड तालुका असल्यामुळे एक संधी मिळाली. माजी मंत्री श्रीमंत पाटील यांचा मुलगा श्रीनिवास यांनी अर्ज दाखल केला होता. मी सतीश जारकीहोळींना विनंती केली होती. सतीश जारकीहोळींच्या नेतृत्वाखाली विनंती केल्यामुळे त्यांनी अर्ज मागे घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन मला संधी दिली आहे.

आमचा कोणताही पॅनेल, पक्ष किंवा गट नाही. आम्ही सर्वपक्षीय पाठिंब्याचे प्रतीक आहोत,” असे त्यांनी म्हटले. रामदुर्गमधून उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आमदार अशोक पट्टण म्हणाले, “काही कारणांमुळे मी अर्ज मागे घेतला आहे. पुढे मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. डीसीसी बँक निवडणुकीत पराभूत झाल्यास मंत्रीपदाला बाधा येऊ शकते. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास मलाही स्थान मिळण्याची शक्यता जास्त आहे,”. रामदुर्गमधून विद्यमान संचालक एस.एस. ढवण आणि मल्अण्णा यादवाड रिंगणात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.