बेळगाव लाईव्ह :खानापूर जांबोटी-चोर्ला-गोवा मार्गावर कालमनी व आमटे गावच्या दरम्यान रात्रीपासून वाहतूक ठप्प झाली आहे. अवजड वाहतूक करणारी एक लॉरी रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने अडथळा निर्माण झाला
. त्यातच दुसरी लॉरी रस्ता बाजूने काढण्याच्या प्रयत्नात असताना रस्ता खचल्याने ती लॉरी पलटी झाली. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.
या घटनेमुळे सकाळपासून शाळा–कॉलेजला जाणारे विद्यार्थी, नोकरी व व्यवसायासाठी प्रवास करणारे नागरिक त्रस्त झाले आहेत. रात्री बंद पडलेली लॉरी अजूनही रस्त्यात असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिक व प्रवाश्यांनी प्रशासनाकडे तात्काळ धाव घेऊन रस्ता मोकळा करण्याची मागणी केली आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी होत आहे.





