बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरातील तिसऱ्या रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाचा रस्ता अत्यंत खराब झाल्याने नागरिक आणि रोजचे प्रवासी हैराण झाले आहेत. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, ये-जा करताना वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येकडे प्रशासनानं तात्काळ लक्ष घालून दुरुस्ती करावी, अशी मागणी करणारे निवेदन माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
सध्या चौथ्या रेल्वे गेटजवळ भुयारी मार्गाचे काम सुरू असल्याने तो रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे चौथ्या रेल्वे गेटवरून येणारी सर्व वाहतूक तिसऱ्या रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाकडे वळवण्यात आली आहे. परिणामी, या अरुंद पुलावर सतत वाहतूक कोंडी होत आहे. दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनांमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होत असून, अवजड वाहनेही याच पुलावरून जात असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. “जर एखादा मोठा अपघात झाला आणि जीवितहानी झाली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
पावसाळ्यात चौथ्या रेल्वे भुयारी मार्गाचे काम सुरू करण्याचा निर्णयच चुकीचा आहे. तसेच, संबंधित बांधकाम कंपनीने महानगरपालिकेकडून परवानगी घेतलेली नाही, असाही आरोप करण्यात येत आहे. हे काम राष्ट्रीय महामार्गाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सुरू असले, तरी हा परिसर गरीब लोकांच्या निवासी इमारतींनी वेढलेला आहे. रिंग रोडचे काम आधीच सुरू असल्याने अवजड वाहनांसाठी भुयारी मार्गाची गरज नसल्याचेही नागरिकांनी निदर्शनास आणले आहे.
या गंभीर परिस्थितीत, जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी विनंती विनायक गुंजटकर आणि बेळगावातील नागरिकांनी केली आहे. हे काम तातडीने न झाल्यास उपोषण आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
ब्रिजवर पडलेल्या खड्ड्यांवर रांगोळी घालत अनोखे आंदोलन केल्यानंतर प्रशासनाला अखेर जागलेल्या असून सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सदर खड्डे मोरमणी बुजवले जाणार आहेत मात्र त्याऐवजी खडी किंवा सिमेंटने खड्डे मोजावेत अशी मागणी गुंजटकर यांनी केली आहे त्यामुळे लवकरचं दिवसात हे देखील काम सुरू व्हायची शक्यता आहे.


