बेळगाव लाईव्ह : बेळगावातील आझम नगरच्या केएलई कंपाऊंडजवळील फर्स्ट क्रॉस हा कचरा डेपोसारखा दिसू लागला आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिक महापालिकेच्या दुर्लक्षाला जबाबदार धरत तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
आझम नगरला महापालिकेकडून पूर्णपणे दुर्लक्षित केले जात आहे असा आरोप येथील स्थानिक नागरिक करत आहेत. शिवाय ,कचरा उचलणारी गाडी दररोज आझम नगरमध्ये येत नाही, ज्यामुळे नागरिक रस्त्याच्या कडेला कचरा टाकत आहेत.
रस्त्यावर पडलेला कचरा उचलण्यासाठीही गाडी दररोज येत नाही, ती तीन दिवसांतून एकदाच येते. परिणामी, रस्त्यावर पडलेला कचरा सर्वत्र पसरतो, ज्यामुळे लोकांना आणि वाहनांना खूप त्रास होत आहे. दिवसभर भटक्या कुत्र्यांकडून कचऱ्याच्या पिशव्या फाडल्या जातात, ज्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरते. या घाणीमुळे संसर्गजन्य रोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
कचरा गाडी दररोज यावी यासाठी अनेकदा सांगितले असूनही, त्यावर कोणतीही कार्यवाही होत नाही. महत्त्वाचे म्हणजे, पथदिवेही दररोज लागत नाहीत; आठवड्यातून दोन-तीन दिवस पथदीप देखील बंद असतात.
याशिवाय, आझम नगरमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या १०० हून अधिक झाली आहे. त्यापैकी काही कुत्रे पिसाळलेली असून, लहान मुलांच्या मागे लागून चावा घेण्याच्या घटना घडत आहेत. रात्रीच्या वेळी कुत्र्यांच्या सततच्या भुंकण्यामुळे नागरिकांची झोपमोड होत आहे. या कुत्र्यांना पकडून जंगलात सोडावे, अशी मागणी नागरिक करत आहेत. याबद्दल तोंडी तक्रार महापालिकेकडे केली असूनही, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे.
आझम नगरच्या नागरिकांनी महापालिका आयुक्तांना या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. आझम नगर स्वच्छ करून संसर्गजन्य रोग पसरू नयेत यासाठी उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांचे आरोग्य आणि आझम नगरचे आरोग्य जपण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.


