बेळगाव लाईव्ह : बेळगावसह उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये होळीच्या दिवशी बोंब मारण्याची प्रथा आहे. यामागे असा अर्थ आहे की, रोगराई, दुष्काळ, अन्याय, उदासीनता आणि समाजातील वाईट गोष्टींना होळीच्या ज्वालेत जाळून टाकायचं आणि त्याविरोधात आवाज उठवायचा.
बोंब म्हणजे एकप्रकारची लक्षवेधी गर्जना. आज चव्हाट गल्लीतील नागरिकांनी मारलेली बोंब प्रशासनाच्या कानावर पडावी आणि येथील रस्त्याची समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत यासाठीच होती.
बेळगावच्या चव्हाट गल्लीमध्ये रस्त्याच्या दुरवस्थेचा अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला. गेल्या तीन वर्षांपासून रस्ता खोदकामानंतर तसाच सोडून दिल्यामुळे संतप्त नागरिकांनी होळीच्या दिवशी ‘रस्त्याचा वाढदिवस’ साजरा करत केक कापला आणि जोरजोरात ‘बोंब’ मारत प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला.
बेळगावमधील चव्हाट गल्लीतील नागरिक गेल्या तीन वर्षांपासून रस्त्याच्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. रस्त्याचे खोदकाम झाल्यानंतर त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना खड्डे, चिखल आणि धुळीतूनच प्रवास करावा लागत आहे.
लोप्रतिनिधी, प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आज होळीच्या दिवशी संतप्त नागरिकांनी “रस्त्याच्या दुरवस्थेचा तिसरा वाढदिवस” साजरा केला. रस्त्यावर केक कापून निषेध नोंदवण्यात आला. विशेष म्हणजे, “बोंब मारत” नागरिकांनी प्रशासनाला जागं करण्याचा प्रयत्न केला.
आम्ही केवळ केक कापून थांबणार नाही, जर वेळेत रस्ता दुरुस्त झाला नाही तर पुढील वर्षी देखील असाच वाढदिवस साजरा करून प्रशासनाचा निषेध नोंदवू असा इशारा येथील नागरिकांनी दिला.