बेळगाव लाईव्ह :बकऱ्यांचे कळप बिनधास्तपणे उभ्या पिकात घालून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करण्याद्वारे दहशत निर्माण करणाऱ्या उद्दाम धनगरांचा पोलीस प्रशासनाने तात्काळ बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी वडगाव, शहापूरसह इतर शिवारातील शेतकऱ्यांनी केली आहे.
शहापूर, वडगाव शिवारातील भाग हा शहरी शेतकऱ्यांचा आहे. हे शेतकरी शेतीबरोबर पर्यायी व्यवसायही करत असल्याने सकाळी किंवा संध्याकाळी शेतात जातात. वडिलधाऱ्यांनी जपलेल्या शेतीत निष्ठापूर्वक कष्ट करत चांगली पीकं घेतात. सध्या शेतात मसूर, वाटाणा, मोहरी, जोधंळासह इतर रब्बी पीकं घेण्यात आली आहेत.
या शेतकऱ्यांपैकी अनेकांनी जनावरं पाळली आहेत. त्यांना चारा हवा म्हणून शेतात जोधंळा पेरणी केली जाते. तथापी अलीकडे भर दुपारी व रात्री शेतकरी शेतात नसलेल पाहून धनगर आपल्या बकऱ्यांचे कळप बिनधास्तपणे उभ्या पीकांत घालून ती फस्त करत आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांसाठी राखलेला हिरवा चारा व जोंधळा धनगर आपल्या बकऱ्यांना खाऊ घालत आहेत.
या प्रकारामुळे शहापूर, वडगाव शिवारातील त्रस्त शेतकऱ्यांवर चारा विकत घेण्याची वेळ आली आहे. पेरलेली आपली पीकं शाबूत रहातात कि धनगराकडून फस्त होतात हिच मोठी चिंता त्यांना लागलेली असते. यदाकदाचित धनगर सापडलेच तर शेतकऱ्यावरच धावून जात आपल्या जाड चप्पलनीं शेतकऱ्याचे पाय उडवून त्यांना जखमी करण्याचा प्रकार करतात. याचा अनुभव अनेक शेतकऱ्यांना आला आहे.
तेंव्हा पोलिस खात्याने योग्य ती कार्यवाही करून शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण मिळवून द्यावे. धनगरानां बोलावून त्यांना सज्जड दम द्यावा. शेतकऱ्यांनी कष्टाने पीकवलेल्या पीकांत बकरी घालून पीकं नष्ट न करता आपली बकरी मोठ्या प्रमाणात पडिक जमीन आहे तिथे घेऊन जावीत अशी सक्त सूचना धनगरांना करावी.
अलीकडच्या काळात एका बाजूला शेतकऱ्यांच्या पीकांची चोरी, बोअरचे नुकसान, रात्री शेतात जूगार, दारु पार्ट्यासह इतर गैरकृत्यं सर्रास सुरु असल्याने शेतकरी महिला शेतात जाण्यास धजत नाहीत. तसेच पीकांसह सुक्या चाऱ्याच्या गंजीही जाळण्याच्या प्रकारने शेतकरी धास्तावले आहेत.
यात भर म्हणून आता धनगरांच्या धास्तीने शेतकरी वर्ग अत्यंत व्यथीत झाला आहे. त्यासाठी लवकरच वडगाव, शहापूरसह इतर शिवारातील शेतकऱ्यांची बैठक आयोजित करुन माननिय पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे.