बेळगाव लाईव्ह: हिडकल जलाशयातील पाणी हुबळी-धारवाड औद्योगिक क्षेत्राला देण्याच्या निर्णयाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्थानिक शेतकरी आणि विविध संघटनांनी ‘आमचे पाणी, आमचा हक्क’ म्हणत संघर्षाची तयारी केली आहे. रविवारी कन्नड साहित्य भवनात या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
हुबळी-धारवाड औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यासाठी चिकोडी आणि गोकाक तालुक्यातून ८० किलोमीटर लांबीची जलवाहिनी उभारली जात आहे. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय, हा प्रकल्प बेळगाव आणि बागलकोट जिल्ह्यातील भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी गंभीर धोका निर्माण करू शकतो.
बेळगाव शहराला सध्या राकसकोप जलाशयातून पाणीपुरवठा होतो. मात्र, त्याची क्षमता केवळ ०.५ टीएमसी असून उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र होते. हिडकल जलाशयावर आधीच बेळगावचा मोठा विसंबून आहे.
या जलाशयाचे पाणी इतरत्र वळवले गेले, तर बेळगाव आणि आसपासच्या भागाला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. अनेक भागांत चार ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो, तर काही ठिकाणी टँकरच्या माध्यमातून पाणी पुरविले जाते.
या परिस्थितीत, हिडकल जलाशयातील पाणी बाहेर वळवण्याचा प्रयत्न हा स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांच्या पाण्याच्या हक्कावर गदा आणणारा आहे. त्यामुळेच या निर्णयाविरोधात तीव्र विरोध केला जात आहे.
शनिवारी मारुती गल्लीत झालेल्या बैठकीत या आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. आता रविवार दि. २ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता कन्नड साहित्य भवनात व्यापक बैठक होणार आहे. या बैठकीत लढ्याची पुढील रुपरेषा ठरणार असून नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.