Friday, September 20, 2024

/

पितरांच्या शांतीचा पितृपंधरावडा झाला सुरू

 belgaum

बेळगाव लाईव्ह:गणपती गेल्यानंतर भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाचा पंधरवडा हा पितृपक्षाचा काळ ओळखला जातो. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवसापासूनच म्हणजेच काल बुधवारी 18 सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरु झाला आहे.

असे म्हंटले जाते की, पितृलोकातून पितर पृथ्वी तलावर येतात म्हणून या दिवसात त्यांची पूजा केली जाते. पूर्वजांचे स्मरण करण्याच्या या काळात पितरांचे तर्पण, श्राद्ध, पिंडदान, ब्राह्मण भोजन, दान-धर्म विधी करून त्यांची शांती केली जाते. त्या अनुषंगाने सध्या शहरासह ग्रामीण भागात हे विधी सुरू झाले आहेत.

पितृपंधरवडा म्हणजे महाळ सुरू झाला असून त्यानिमित्ताने सध्या विशेष करून ग्रामीण भागामध्ये घरोघरी पूर्वजांच्या आणि पितरांच्या पूजा विधीचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. ग्रामीण भागात पितृपक्षानिमित्त घरात कुलदैवतेसमोर रांगोळी वगैरे काढून होम केला जातो.

त्यानंतर आपल्या पितरांना दहीभाताचा तसेच त्यांच्या आवडीच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच घराबाहेर येऊन आकाशाकडे पहात पितरांकडे आम्हा सर्वांना सुखात ठेवा, आमच्या पाठीशी राहा, आमच्या संसारासह उद्योग व्यवसायावर तुमचा आशीर्वाद असू दे, अशा प्रकारची प्रार्थना केली जाते.

यावेळी एका चाळणीत दहीभाताचे मुटले, वांगी बटाट्याची भाजी, लाल भाजी, केळी, पान विडा, खीरवडा वगैरे गोडधोड पदार्थाचा नैवेद्य पितरांना दाखवला जातो. त्यानंतर ती चाळणी घराच्या छतावर ठेवून तो नैवेद्य कावळ्यांना खाऊ घातला जातो. सध्या हा विधी ग्रामीण भागात घरोघरी मोठ्या श्रद्धेने केला जात असल्याचे दिसून येत आहे.

पितृपक्षाच्या पंधरवड्यात पितरांच्या आवडीचे जेवण बनवून कावळ्याला खाऊ घातले जाते. आपले वाडवडील पितर कावळ्याच्या रूपात येतात अशी भावना असल्यामुळे सध्या पितृपक्षात कावळ्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. एरवी अशुभ, बहिष्कृत मानल्या जाणाऱ्या कावळ्याने पितरांच्या नैवेद्याला स्पर्श करावा, तो त्याने खावा यासाठी सर्वजण आतुर झालेले पहावयास मिळत आहेत.Pitru pandharvdha

यासाठी तोंडाने आवाज काढून आवाहन करण्याबरोबरच कावळ्याच्या दिशेने भाताचे मुटले फेकून त्याला नैवेद्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पितृपक्षाला श्राद्ध पक्षाच्या नावाने देखील ओळखलं जातं. पितृ पक्षात ब्राह्मनांना भोजन, वस्त्र दान, श्राद्ध करणं, पितृ पूजा, पितृ तर्पण आणि पिंड दान करणं सर्वात पुण्याचं व शुभ काम मानलं जातं.

या दरम्यान काही कार्य करणं अशुभ मानलं जातं. पितृपक्षाच्या दरम्यान कांदा आणि लसूणसह तामसिक पदार्थांचं सेवन करु नये. या काळात विवाह, पूजा, गृह प्रवेश तसेच अन्य कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई असते. नवीन वस्त्र, सोनं, चांदी यांसारख्या वस्तू खरेदी करणं अशुभ मानलं जातं.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.