बेळगाव लाईव्ह :काँग्रेसमधील 25 ते 30 ज्येष्ठ आमदार पक्षातून बाहेर पडू नयेत. त्यांनी बंड करू नये, त्यांच्यावर दबाव आणता यावा, यासाठी काँग्रेसच्या एका नेत्याने ऑपरेशन हस्तचा डाव रचला आहे. पण, माझा कोणताही सहकारी अशा प्रकारांना बळी पडणार नाही, आम्ही भाजपमध्येच राहणार, आमच्या राजकारणाची समाप्ती भाजपातचं होणार असे आमदार रमेश जारकीहोळी यांनी सांगितले.
अथणी येथे पत्रकारांशी बोलताना जारकीहोळी यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावर टीका केली. काँग्रेसचे 25 ते 30 आमदार हॉटेलमध्ये जमले होते. ते बंड करतील, या भीतीने एका नेत्याने ऑपरेशन हस्त होणार आहे, अशी अफवा पसरवली आहे. भाजपचे आमदार काँग्रेसमध्ये येणार आहेत, असे सांगण्यात आले. पण, हे सगळे त्या नेत्याचे नाटक आहे, असे रमेश जारकीहोळी म्हणाले.
निवडणुकीनंतर कमीत कमी सहा महिने मी राजकारणावर बोलणार नाही असे ठरवलं होतं मात्र मला आज बोलावं लागत आहे असंही जारकीहोळी यांनी यावेळी नमूद केलं.
आम्हाला भाजपकडून कोणी बोलावले नव्हते. पण, काँग्रेसमध्ये झालेल्या अन्यायातून आम्ही बाहेर पडलो. त्यामुळे ते ऑपरेशन कमळ नव्हते. राज्य सरकार दुष्काळ जाहीर करण्यास टाळाटाळ करत आहे. मी पाहिलेले सिद्धरामय्या मला दिसत नाहीत. 2013 ते 2018 या काळात मी त्यांच्यासोबत मंत्री होता तेव्हा त्यांना मोकळे हात होते. आता सिद्धरामय्या यांच्या चेहर्यावर आनंद नाही.
रमेश जारकीहोळी म्हणाले की, शोभा करंदलाजे यांनी जगदीश शेट्टर आणि लक्ष्मण सवदी यांना अप्रत्यक्ष निमंत्रण दिले आहे. पण, तशा नेत्यांची आम्हाला गरज नाही. ते स्वयंघोषित नेते आहेत. मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. माझ्या मुलीला तिकिट मिळाले तरी मी पक्षाचेच काम करणार आहे असेही ते म्हणाले.