बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यात खालचे पूल पाण्याखाली जातात. त्यामुळे लोकांच्या सोयीसाठी कायमस्वरूपी पर्यायी मार्ग उभारणीच्या शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. राज्यातील हवामान व पाऊस-पिक याबाबत सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमवेत बुधवारी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये ते बोलत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी खासगी बँकांसह कोणत्याही बँकांकडून घेतलेले कर्ज वसूल करण्याची सक्ती शेतकऱ्यांना करता येणार नाही. याप्रकरणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अजूनही काही ठिकाणी पेरणी बाकी असल्याने आवश्यक बी-बियाणे, खत उपलब्ध करून द्यावे, अशा कडक सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिल्या.
दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जात असलेल्या पुलांसाठी कायमस्वरूपी पर्यायी मार्ग तयार करणे आवश्यक असून सदंर्भात सर्वेक्षण करून सविस्तर अहवाल पाठवावा, याची सरकारी पातळीवर चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कृष्णा, मलप्रभा, घटप्रभा, भीमा या प्रमुख नद्यांच्या रेंजमध्ये अधिक देखरेख ठेवली पाहिजे. कोणतीही अडचण येऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी, अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीत मानवी जीवन धोक्यात येऊ नये यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांनी तातडीने सर्व खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. धोक्याच्या पातळीच्या पलीकडे वाहणाऱ्या नद्या आणि धोकादायक ठिकाणे ओळखून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावि, तसेच धोकादायक ठिकाणी जाण्यावर निर्बंध लादले जावे, महसूल, ग्रामविकास, पोलीस एकमेकांच्या समन्वयाने काम करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. यावेळी जिल्हा-तालुका रुग्णालये, सामुदायिक आरोग्य केंद्र, शाळा, अंगणवाडी केंद्र, वसतिगृहांसह शासकीय इमारतींची पाहणी करून आवश्यक ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्याची कार्यवाही करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
राज्य आपत्ती व्यवस्थापन मदत अंतर्गत इमारतींच्या दुरुस्तीची संधी असून हे अनुदान तातडीने वापरून दुरुस्ती करावी. एस.डी.आर.एफ. आणि एन.डी.आर.एफ. यांनी हाती घेतलेली कामे पूर्ण करावीत, असे महसूल मंत्री कृष्णा भैरेगौडा यांनी सांगितले.
यावेळी जिल्ह्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा सादर करताना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बेळगाव जिल्ह्यात पुराची भीती नसल्याचे सांगितले. कृष्णा नदीत १ लाख क्युसेक पाण्याचा प्रवाह असून तूर्तास पुराची भीती नसल्याचे सांगितले. नाही. यावेळी अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी झालेल्या घटनांचा आढावाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. या बैठकीत विविध अधिकाऱ्यांनीही अतिवृष्टीसंदर्भात आढावा सादर केला.
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्हिडिओ संभाषणात मंत्री जी. परमेश्वर, चलुवरायस्वामी, के जे जॉर्ज, प्रियांक खर्गे, लक्ष्मी हेब्बाळकर आदींसह बेळगावचे पोलीस आयुक्त एस. सिद्धरामप्पा, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.संजीव पाटील, महानगर आयुक्त अशोक दुडगुंटी, उपजिल्हाधिकारी राजेश नायक, प्रभाती फकिरापुरा यांच्यासह कृषी, आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा, ग्रामविकास आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.